फोनपे स्कॅनद्वारे प्रवाशांकडून जबरदस्ती वसुली करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळीचा पर्दाफाश

फोनपे स्कॅनद्वारे प्रवाशांकडून जबरदस्ती वसुली करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळीचा पर्दाफाश
न्यायालयाने सुनावली एक महिन्याची शिक्षा
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या विविध रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना धमकावून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांच्या आठ जणांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, ही टोळी परप्रांतीय प्रवाशांना लक्ष्य करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळत असल्याची माहिती पुढे आली आहे.
तक्रारीनुसार, संशयित तृतीयपंथी रोख रक्कम नसल्यास प्रवाशांसमोर स्कॅनर पुढे करत ऑनलाईन पद्धतीने ₹100 ते ₹200 पर्यंतची रक्कम वसूल करत होते. त्यांच्या मोबाईलमधील फोन पे व्यवहारांच्या नोंदींमध्ये अशी अनेक बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन आढळून आल्या. या प्रकाराबाबत प्रवाशांनी सोशल मिडिया तसेच रेल्वे हेल्पलाईनवर तक्रारी नोंदवल्या होत्या.
रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के.एन. राय (क्राईम ब्रँच) आणि निरीक्षक पी.आर. मीना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने २५ व २६ जूनच्या रात्री धडक कारवाई करत सहा तृतीयपंथी आणि त्यांच्या दोन चालकांना गाड्यांमध्ये रंगेहाथ पकडले.
गुरुवारी संशयितांपैकी चार तृतीयपंथी आणि दोन सहकाऱ्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांना एक महिन्याची शिक्षा सुनावली असून, जळगाव कारागृहात हलवण्यात आले आहे.
रेल्वेच्या सुरक्षेसाठी अशा टोळ्यांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त जोशी यांनी स्पष्ट केले.