बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या जनतेच्या मागणीची दखल घेण्यात यावी – पटोले

मुंबई : राज्यातील नव्या सरकार बद्दल जनतेच्या मनात अद्याप संभ्रम असून, हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे, अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
रविवारी, विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, माझे मत मी दिलेल्या उमेदवारालाच जाते का, यावर जर मतदारांना शंका असेल तर त्याचे समाधान झाले पाहिजे. मारकडवाडीतील लोकांनी बॅलेट पेपरवरील मतदानासाठी मॉक पोलिंग घेण्याचा निर्धार केला होता पण निवडणूक आयोग, पोलीस प्रशासनाच्या मदतीने सरकारने त्यांची मुस्कटदाबी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ७६ लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाला द्यावे लागेल, पण ते समाधानकारक उत्तर देत नाहीत.