शेतीच्या वादातून भावाकडून जबर मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून भावाकडून जबर मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील पैलाड भागातील शेतीच्या वादातून एका व्यक्तीस त्याच्या सख्या भावासह पुतण्यांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश गोरख पाटील यांना वडिलोपार्जित गट नं. ७८९ मधील २ एकर ७२ आर शेतीबाबत सुरु असलेल्या वादात त्यांचा मोठा भाऊ राजेंद्र गोरख पाटील यांनी वडिलांची खोटी सही घेत जमीन आपल्या नावे केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयीन चौकशी सुरू आहे.
दि. २१ रोजी सकाळी सुरेश पाटील पत्नीसोबत शेतात गेले असताना, त्यांचा भाऊ राजेंद्र पाटील, पुतण्या गोरख पाटील व दीपक शिवराम पाटील या तिघांनी लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. सुरेश पाटील यांच्या पत्नीने हस्तक्षेप करत भांडण थांबवले. गंभीर दुखापत झाल्यामुळे सुरेश पाटील यांना तात्काळ धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या मारहाणीप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करत आहेत.