Other

खेळांमध्ये तरुणांचे भविष्य – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन

खेळांमध्ये तरुणांचे भविष्य – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन
जळगावात ३८ वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात सुरू

जळगाव, दि. २ ऑगस्ट – “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये वाढता तणाव लक्षात घेता, खेळ हा मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. बुद्धिबळासारख्या खेळामुळे नियोजन, संयम आणि निर्णयक्षमता विकसित होते. त्यामुळे खेळ हा केवळ छंद न राहता आयुष्याचा अविभाज्य भाग बनावा,” असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

जैन हिल्स, जळगाव येथील ‘अनुभूती मंडपम’मध्ये सुरु झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

उद्घाटन सोहळा:
दि. २ ते ८ ऑगस्ट दरम्यान स्वीग लीग पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या स्पर्धेचे उद्घाटन रक्षा खडसेखासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी बुद्धिबळाच्या पटावर मोहरा हलवत औपचारिक सुरुवात केली. पाच वर्षीय वल्लभ कुलकर्णी या चिमुकल्यासोबत मंत्री खडसे यांनी बुद्धिबळ खेळून उपस्थितांची मने जिंकली.

उपस्थित मान्यवर:
यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरुआ (कोलकाता) उपस्थित होते.

भविष्यातील दिशा आणि पॉलिसीचे संकेत:
रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी वाढावी यासाठी शासनस्तरावर विशेष ‘स्पोर्ट्स पॉलिसी’ तयार केली जात असल्याचे जाहीर केले. या धोरणाअंतर्गत खेळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा आणि भारताची ऑलिम्पिकमधील उपस्थिती अधिक ठळक व्हावी यावर भर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेतील वैशिष्ट्ये:
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने यावेळी स्पर्धेचे नियोजन लिंगभेद न करता करण्यात आले असून, समान पारितोषिक वितरण तसेच विजय, पराजय आणि बरोबरी या तिन्ही प्रकारांतील कामगिरीनुसार स्पर्धकांचे मूल्यांकन करून पारितोषिके दिली जाणार आहेत.

संवेदनशील स्वागत आणि कौतुक:
खासदार स्मिता वाघ यांनी २८ राज्यांतील स्पर्धकांना शुभेच्छा देत, “शिकून जा किंवा जिंकून जा, परंतु जळगावची आठवण घेऊन जा,” असे भावनिक उद्गार काढले.

अभिनंदन आणि स्मरण:
अतुल जैन यांनी दिव्या देशमुख व कोनेरु हम्पी यांच्यासारख्या महिला बुद्धिबळपटूंच्या यशाचा दाखला देत जळगावमधून देखील आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, असे उद्गार काढले.

स्पर्धेचे तांत्रिक मार्गदर्शन:
मुख्य आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरुआ यांनी स्पर्धकांसाठी नियमावलीचे सविस्तर सादरीकरण केले.

उद्घाटन समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. जळगावच्या निसर्गरम्य जैन हिल्सवर सुरु झालेल्या या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी मोठा आनंदाचा क्षण ठरला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button