जळगावात किरकोळ वादातून दगडफेक; दोन जण जखमी, परिसरात तणाव

जळगावात किरकोळ वादातून दगडफेक; दोन जण जखमी, परिसरात तणाव
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील स्वामी समर्थ केंद्र चौकात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन तरुण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (२२ जुलै) रात्री ९ वाजता घडली असून, यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एका मेडिकल स्टोअरवरील तरुणाला कामावरून कमी केल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद अखेर मंगळवारी रात्री उफाळून आला. त्या वेळी परिसरातील काही तरुण अपार्टमेंटजवळ उभे असताना, दुचाकींवरून आलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली.
या अचानक हल्ल्यात सागर पाटील व मनोज निंबाळकर हे दोघे किरकोळ जखमी झाले असून, दगडफेकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या आगमनाने हल्लेखोर तेथून पळून गेले.
परिसरातील तणाव लक्षात घेता पोलिसांनी QRT (क्विक रिस्पॉन्स टीम) पथकाला पाचारण केले असून, बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात असून, पुढील कारवाई सुरू आहे.