पाण्यासाठी पोलीस वसाहतीतील कुटुंबीयांची भटकंती!

पाण्यासाठी पोलीस वसाहतीतील कुटुंबीयांची भटकंती!
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील पोलिस वसाहतीमध्ये मागील सहा दिवसांपासून पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. वसाहतीतील पाणीपुरवठा करणारी मोटार बिघडल्यामुळे पोलिस कुटुंबियांना पाण्यासाठी दररोज टँकरची वाट पाहावी लागत आहे. दरम्यान, पाण्यासाठी होणारी ही धावपळ आता असह्य झाली असून, महिला आणि लहान मुलांसह सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वसाहतीतील पाणीपुरवठा करणारी मोटार जळाल्याचे कारण पुढे आले आहे. मात्र, सहा दिवस उलटून गेले तरी मोटार दुरुस्त करण्यात आलेली नाही. परिणामी, शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पाण्यासाठी दररोज भटकंती करत आहेत. काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी ते अपुरे ठरत असल्याने अनेक वेळा भांड्यांमध्ये पाणी मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे.
या वसाहतीत सुमारे १०० पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास असून, दिवसाला हजारो लिटर पाण्याची गरज भासते. परंतु टँकरच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने महिला वर्गाला घरगुती कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पूर्वीही अशाच प्रकारच्या पाणीटंचाईमुळे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा तीच परिस्थिती ओढवली असून, संबंधित विभागाने तातडीने मोटार दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी पोलिस वसाहतीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.