
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पोलीस खात्यातील गुन्हे शोधाच्या कामी सर्वात महत्वाची मानली जाणारी शाखा म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी). राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगावात एलसीबीकडे सर्वांचे जरा जास्तच लक्ष असते. अलीकडच्या काही वर्षात तर एलसीबी निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक या पोस्टिंगसाठी सुरु असलेली चढाओढ आणि त्यानंतर वाढणारी कर्मचाऱ्यांची स्पर्धा अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरते. वरिष्ठ अधिकाऱ्याला एखाद्या चुकीमध्ये अडकवायचे आणि त्याला बाजूला सारायचे असा सर्व कार्यक्रम करण्यासाठी कर्मचारीच राजकारण्यांच्या दरबारी जुगाड करतात. सध्या ड्रग्स प्रकरणाला वेगळे वळण देत असाच प्रकार सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे.
राज्यात कुठेही आणि कोणत्याही प्रकरणात सहज टार्गेट करता येणारा विभाग म्हणजे पोलीस दल. पोलीस प्रशासनातील सर्वच पदे महत्वाची असतात आणि प्रत्येकाची जबाबदारी देखील तेवढीच महत्वाची असते. पोलीस दलातील प्रत्येक पोस्टिंगसाठी जुगाड केला जातो आणि त्यासोबतच अधिकारी ती जबाबदारी पार पाडण्यास तेवढा सक्षम आहे का हे देखील पाहिले जाते. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे कामकाज उत्तम सुरु असून त्याचेच फळ म्हणून शासनाच्या १०० दिवस विशेष अभियानात जळगाव जिल्हा पोलीसदलाने तृतीय क्रमांक पटकावला.
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
दि.१३ जून २०२४ पासून जळगाव एलसीबीचा पदभार सांभाळताना बबन आव्हाड यांच्या कार्यकाळात आणि मार्गदर्शनाखाली पथकाने खून १०, दरोडा १, जबरी चोरी १५ (१० चेन स्नॅचिंग), घरफोडी १६, चोरी ८१, आर्म एक्ट १०, अमली पदार्थ १५, गोळीबार ५, खुनाचा प्रयत्न २ असे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच ८ महिन्यात तब्बल २५ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अनेक गुन्हेगारांना शोधून त्यांच्याकडून १५० पेक्षा अधिक दुचाकी आणि ३० पेक्षा अधिक सायकल हस्तगत केल्या. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जाते. मुक्ताईनगर येथे २ कोटींचा गुटखा पोलिसांनी पकडला.
खून, दरोड्यासह सर्वच मोठे गुन्हे उघड
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात घडलेले सर्वच खून, दरोड्याचे मोठमोठे गुन्हे उघड करण्यात पथकाला यश आले आहे. वर्षभरातील एकही मोठा गुन्हा अद्याप प्रलंबित नाही. पोलीस अधिक्षकांनी आपल्या कामकाजात वापरलेल्या नवनवीन पद्धती आणि नियमित बैठक, पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. येणाऱ्या काळात आणखी काही नवनवीन संकल्पना ते कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
तपासाचा भार त्यात कर्मचाऱ्यांचे अंतर्गत वॉर
जळगावात स्थानिक गुन्हे शाखेचा एका तपाचा इतिहास पाहिला असता निरीक्षक डी.डी.गवारे यांच्यानंतर किसनराव नजनपाटील यांनीच आपला कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून येते. इतर सर्व निरीक्षक कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच बाजूला झाले आहे. जळगावात एलसीबीच्या खुर्चीवर बसण्यासाठी भाऊ, दादा, आप्पा, मामा यांचा आशिर्वाद आवश्यक असतो हे सर्वश्रुत आहे. राजकीय वरदहस्त असला तरी त्या खुर्चीवर बसल्यानंतर कर्मचाऱ्यांना सांभाळणे देखील मोठे जिकरीचे काम असते. गुन्हे तपासाचा भार त्यातच कर्मचाऱ्यांमध्ये असलेले गटबाजी रोखणे हे देखील दिव्य पार पाडावे लागते. एखाद्याचे कर्मचाऱ्याशी जमले नाही तर तो लागलीच अधिकाऱ्याला हटविण्यासाठी आपला राजकीय जुगाड वापरतो आणि राजकारण्यांचे कान भरायला सुरुवात करतो.
खुर्चीच्या मोहापायी होतो गेम
एखाद्या अधिकाऱ्याच्या दरबारात आपली डाळ शिजत नसल्याचे लक्षात आल्यास काही कर्मचारी एकत्र येतात आणि चुका शोधायला सुरुवात करतात. एखादा अधिकारी प्रामाणिकपणे आपले काम करीत असला तर त्याच्याबद्दल काहीतरी चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्यास ते सुरुवात करतात. सर्व प्रकरण इथेच थांबत नाही तर यापूर्वी एलसीबीच्या खुर्चीवर बसण्यासाठी इच्छूक असलेला किंवा सध्या इच्छुक असलेल्या अधिकाऱ्याशी ते कर्मचारी जवळीक वाढवतात. खुर्चीची लालसा त्याच्या मनात निर्माण करून आपले राजकीय हितसंबंध किती आहे हे त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेच सुरु होतो खरा खेळ. खुर्चीचा मोह मनात आला कि षडयंत्र रचून अधिकाऱ्याचा काटा काढला जातो.
ड्रग्स प्रकरणाला दिले जातेय खतपाणी
जळगाव जिल्ह्यात शहर पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्स प्रकरणाला पोलीस प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी खतपाणी घालत आहेत. संपूर्ण प्रकरणाच्या माहितीमध्ये भर घालून ते माध्यम प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवले जात आहे. जळगाव जिल्ह्यात ड्रग्सची व्याप्ती मोठी असली तरी त्यात सर्वच पोलीस सहभागी आहेत असे मुळीच नाही. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे नाव समोर आल्यानंतर त्या प्रकरणाला आणखी मोठे केले जात असून ते पुढे स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक आणि पुढे पोलीस अधिक्षकांपर्यंत जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गुन्ह्यात मूळ जे आहे ते बाजूला सारत दुसरेच मुद्दे पुढे करून वरिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीतील बसवण्यासाठी काही जणांचे हे प्रयत्न सुरु आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे ऐकून गेल्या काही वर्षात सुरु असलेल्या असल्या प्रकारांना जिल्ह्यातील दिग्गज राजकारण्यांनी देखील खतपाणी न घालता कधीतरी जिल्ह्याच्या हिताचा विचार करायला हवा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता आणि पोलीस प्रशासनातील सुज्ञ कर्मचारी व्यक्त करीत आहे.
पोलीस अधिक्षकांची संयमी भूमिका
जळगाव जिल्ह्यात काय सुरु आहे, कोण कुठल्या राजकारण्याच्या हितसंबंधातील आहे, कुणावर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे, कोण कोणत्या कामासाठी कुणाचा फोन आणतो हे गेल्या सव्वा वर्षात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी चांगलेच ओळखले आहे. गेल्या वर्षी पोलिसांच्या बदल्या करताना त्यांनी हा अनुभव चांगलाच अनुभवाला. ड्रग्स प्रकरणात देखील पोलीस अधिक्षकांनी संयमी भूमिका घेतली आहे. तपास संथगतीने सुरु असला तरी त्यात अधिकचे लक्ष घालत सर्व आरोपांना खोडून दूध का दूध आणि पाणी का पाणी होणे आवश्यक आहे. ड्रग्स प्रकरणातील फरार संशयिताच्या मुसक्या आवळल्यानंतर सर्व समोर येईल हे खरे असून त्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावणे गरजेचे आहे.