राज्यातील पोलिस दलात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाका; ५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पोलिस दलात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाका; ५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई l महापोलीस न्यूज l राज्यातील महायुती सरकारने पोलिस आणि प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत तब्बल ५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, जळगाव, धुळे, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून काहींची पदकपात करून नव्या जागांवर बदली करण्यात आली आहे.
पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखेचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1, पुणे येथे समादेशक पदावर बदली करण्यात आली आहे. तर, पुणे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे करण्यात आली आहे. पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. याशिवाय, पुण्यात तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
मुंबईत देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बदल्या झाल्या आहेत. महेंद्र पंडित यांची स्तंभ २ मधून स्तंभ ३ मधील पदावर बदली करत त्यांना बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचीही बदली होऊन त्यांना मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे. यासोबतच विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील या चार अधिकाऱ्यांची देखील मुंबईतील पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर मुंबईत नियुक्ती झाली आहे.
फक्त आयपीएस नव्हे, तर आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्यांचा सपाटा सुरूच आहे. पंधरा दिवसांपूर्वी राज्य सरकारने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर गेल्या आठवड्यात आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये मुंबई मेट्रो झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची बदली वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. तसेच, चे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली यशदा, पुणेचे उपसंचालक म्हणून करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या या मोठ्या बदल्यांमुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीत गतिमानता येण्याची आणि कार्यक्षमतेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.