अल्पवयीन मुलीचा विवाह, पित्याची आत्महत्या : घटनेला वेगळे वळण मिळणार..

महा पोलीस न्यूज । दि.२९ जून २०२५ । जळगावात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रोकड आणि दागिन्यांच्या बदल्यात विकण्यात आले. पुढे तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. या प्रकाराची तक्रार करण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी आठ दिवस पोलिस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवले, पण तक्रार दाखल न झाल्याने त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून संपूर्ण प्रकरणात लग्नाच्या बहाण्याने पैसे लाटणारी एक टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.
जळगावातील काही महिलांनी हरिविठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला रोजगाराचे आमिष दाखवून नाशिक येथे नेले. तिथे तिला कोल्हापूरच्या काही लोकांना अडीच लाख रुपये रोख आणि दागिन्यांच्या बदल्यात विकण्यात आले. या व्यक्तींनी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या काळात मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली आणि तिचा गर्भपातही झाला. या अमानवीय कृत्याला कंटाळून मुलगी घरी पळून आली आणि तिने आपली आपबिती कुटुंबीयांना सांगितली. मात्र, मुलीला विकत घेणाऱ्या कोल्हापूर येथील कुटुंबाने तिला परत पाठवण्याची आणि पैशांची मागणी करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या त्रासाला कंटाळून आणि पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अशी माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली आहे.
पोलिसांची रुग्णालयात धाव
रामानंदनगर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपासून तक्रार नोंदवली नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. तसेच घडलेल्या प्रकाराची पोलिसांत नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसात तक्रार दाखल, सखोल तपास सुरू
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दोन दिवसापूर्वी पोलिसात दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, काही महिलांनी त्या मुलीला आमीष दाखवून तिचे लग्न कोल्हापूर येथे लावून देण्यात आले होते. एप्रिल महिन्यात तिचा गर्भपात झाला होता. मुलगी कुटुंबियांच्या संपर्कात देखील होती मात्र त्यांना इतर प्रकार माहिती नसल्याचे म्हटले जाते. तसेच कोल्हापूर येथील मंडळींच्या देखील ती संपर्कात होती. कोल्हापूर येथील लोक घरी येऊन पैसे किंवा मुलगी परत देण्याचे सांगत होते. दरम्यान, लग्न लावून देणाऱ्या महिलांनी हा सर्व प्रकार समोर आणला नाही, उलट मुलगी अनाथ असल्याचे सांगितले होते अशी माहिती समोर येत आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे रामानंद नगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून असून सखोल तपास सुरू आहे.