संकटमोचकांच्या जिल्ह्यात राज्याला हादरवणारी घटना, पित्याने उचलले गंभीर पाऊल..
जळगावात अल्पवयीन मुलीच्या विक्री आणि जबरदस्तीच्या लग्नाचा धक्कादायक प्रकार

महा पोलीस न्यूज । दि.२९ जून २०२५ । जळगावात मानवतेचा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रोजगाराच्या बहाण्याने नाशिक येथे नेऊन तिला अडीच लाख रुपये आणि दागिन्यांच्या बदल्यात कोल्हापूरच्या काही व्यक्तींना विकण्यात आले. यापुढे जाऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराची तक्रार करण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी आठ दिवस पोलिस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवले, पण तक्रार दाखल न झाल्याने त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील काही महिलांनी हरिविठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला रोजगाराचे आमिष दाखवून नाशिक येथे नेले. तिथे तिला कोल्हापूरच्या काही लोकांना अडीच लाख रुपये रोख आणि दागिन्यांच्या बदल्यात विकण्यात आले. या व्यक्तींनी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या काळात मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली आणि तिचा गर्भपातही झाला. या अमानवीय कृत्याला कंटाळून मुलगी घरी पळून आली आणि तिने आपली आपबिती कुटुंबीयांना सांगितली. मात्र, मुलीला विकत घेणाऱ्या कोल्हापूर येथील कुटुंबाने तिला परत पाठवण्याची आणि पैशांची मागणी करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या त्रासाला कंटाळून आणि पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
संकटमोचकांच्या जिल्ह्यात घटना, सरकारवर प्रश्नचिन्ह
रामानंदनगर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपासून तक्रार नोंदवली नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे मुलीच्या कुटुंबाला केवळ मानसिक त्रासच नाही, तर न्याय मिळण्याची आशाही मावळली. कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यावरून पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडला असल्याने पीडितेला न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारी यंत्रणेच्या नाकर्तेपणाचा बळी
हा प्रकार केवळ एका कुटुंबाची व्यथा नाही, तर समाजातील मुलींच्या सुरक्षिततेचा आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास दाखवलेली उदासीनता आणि गुन्हेगारांना मिळणारा मोकळा रस्ता यामुळे सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होत आहे. या प्रकरणाने राज्य सरकारच्या महिला सुरक्षा आणि बालसंरक्षणाच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरु
संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दोन दिवसापूर्वी पोलिसात दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. दरम्यान, मुलीला काहीतरी आमिष दाखवून तिला काही महिलांनी पळवून नेले आणि तिचे लग्न लावले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यादृष्टीने तक्रार दाखल करून घेण्यात येत असून तपास केला जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली आहे.