मनवेलमध्ये मिरवणुकीदरम्यान तुफान राडा; १६ जणांवर गुन्हे दाखल

मनवेलमध्ये मिरवणुकीदरम्यान तुफान राडा; १६ जणांवर गुन्हे दाखल
यावल (प्रतिनिधी): यावल तालुक्यातील मनवेल गावात जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. या घटनेमुळे गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून एकूण १६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. काढण्यात आलेली मिरवणूक दादाजी धुनीवाले मंदिर आणि विठ्ठल मंदिराजवळ पोहोचली असताना दोन गटांमध्ये वाद उफाळून आला.
पहिल्या गटातर्फे फिर्याद दिलेल्या सुनीता विकास अडकमोल (वय ४०, रा. मनवेल) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं की, मिरवणुकीदरम्यान महिलांच्या अंगावर नाणे स्वरूपात पैसे फेकण्यात आले. याबाबत जाब विचारला असता, वाद उफाळून आला आणि मिरवणुकीतील महिला व पुरुषांना मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून नाना रमण पाटील, कुणाल श्याम पाटील, यज्ञेश पंडित पाटील, हर्षल रणछोड पाटील, भरत कोळी आणि शंकर देविदास पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटातर्फे पन्नालाल हुकुमचंद पाटील (वय ४२, रा. मनवेल) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मिरवणुकीतील वाद्यांची गाडी महादेव मंदिराच्या भिंतीला धडकली. यामुळे झालेल्या नुकसानीबाबत विचारणा केली असता वाद उफाळून आला. त्यानंतर नयन अडकमोल, आदेश इंधाटे, विलास इंधाटे, सुभाष भालेराव, प्रथमेश सोनवणे, भूषण भालेराव, सागर इंधाटे, योगेश इंधाटे, मनोज भालेराव आणि गोकुळ इंधाटे या दहाजणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील ५ हजार रुपये चोरी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दोन्ही तक्रारींवरून यावल पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.