आ.राजूमामा भोळेंनी सपत्नीक केले वाघूर धरणाचे जलपूजन

महा पोलीस न्यूज । दि.४ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे २२ किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे १०० टक्के पूर्ण भरले आहे. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज बुधवार, दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी सपत्निक माजी महापौर सीमा भोळे यांच्यासह धरणस्थळी साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.
यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता. याप्रसंगी आ.राजूमामा भाळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव १०० टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुण देवता चरणी लीन होऊन केली.
नागरिकांना केले आवाहन
वाघूर धरणाचे बांधकाम १९७८ मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा धरण १०० टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता ही मिटली आहे. दरम्यान, पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र असून त्यावर अंमल करीत सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची नासाडी न करता बचत करावी, असे आवाहन आ.भोळे यांनी केले आहे.