केंद्र सरकारकडून राज्यांना मॉक ड्रीलचे निर्देश; नागरिकांच्या सुरक्षेसाठी उद्या (७ मे) सराव

केंद्र सरकारकडून राज्यांना मॉक ड्रीलचे निर्देश; नागरिकांच्या सुरक्षेसाठी उद्या (७ मे) सराव
नवी दिल्ली: केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व राज्यांना मॉक ड्रील आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे रोजी देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ल्यापासून बचावासाठी मॉक ड्रील घेण्यास सांगितले आहे.
मॉक ड्रील म्हणजे काय?
नागरी संरक्षण नियम, १९६८ अंतर्गत आयोजित या मॉक ड्रीलचा उद्देश युद्धकाळात हवाई हल्ल्याच्या परिस्थितीत नागरिक किती जलद आणि प्रभावीपणे स्वतःचा बचाव करू शकतात हे तपासणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि भीती कमी करणे हा आहे. या सरावात युद्धसदृश वातावरण निर्माण केले जाईल. सायरन वाजवले जाईल, काही शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करून ब्लॅकआउटचा सराव होईल आणि नागरिकांना जवळच्या आश्रयस्थळी जाण्याची प्रक्रिया शिकवली जाईल.
कोण सहभागी होणार?
या मॉक ड्रीलमध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस, होमगार्ड्स, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होतील. राष्ट्रीय सुरक्षेसाठी केवळ लष्करच नव्हे, तर सामान्य नागरिकांनीही युद्धजन्य परिस्थितीत संयम आणि योग्य प्रतिसाद कसा द्यावा, हे शिकणे गरजेचे आहे, असे यातून दाखवले जाईल
.प्रशिक्षण आणि सराव
संवेदनशील भागात सायरन चाचणी घेतली जाईल. शाळा, कार्यालये आणि सामुदायिक केंद्रांमध्ये ड्रॉप-अँड-कव्हर, प्रथमोपचार, आश्रयस्थळ शोधणे आणि मानसिक स्थैर्य राखण्याबाबत कार्यशाळा होतील. रात्रीच्या हल्ल्याच्या परिस्थितीत शहर लपवण्यासाठी वीजपुरवठा बंद केला जाईल. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धातही असा सराव झाला होता. लष्करी तळ, दळणवळण टॉवर आणि वीज प्रकल्पांना हवाई देखरेखीपासून संरक्षण देण्याचा सराव होईल. तसेच, उच्च-जोखीम क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतराचा सरावही केला जाईल.पाकिस्तानसोबत तणाव आणि भारताला मिळालेला पाठिंबाभारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, एका जुन्या मित्रराष्ट्राने भारताला पाठिंबा दर्शवल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे. या मॉक ड्रीलमुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि युद्धजन्य परिस्थितीत त्यांची तयारी सुधारेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.