
सरपंच पदाचा गैरवापर भोवला; ४.२० लाखांचा शासकीय निधी परत करण्याचे आदेश
महापोलीस न्यूज | प्रतिनिधी – सुभाष धाडे
मुक्ताईनगर (ता. २९ जून) – मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच राहुल अप्पा रोटे यांच्यावर पदाचा गैरवापर करून शासकीय योजनांचा लाभ अपात्र नातेवाइकांच्या नावे घेऊन सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असून, सदर रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
राजुरा ता. मुक्ताईनगर येथील ग्रा.पं. उपसरपंच आणि आताचे प्रभारी सरपंच राहुल अप्पा रोटे यांनी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रा.पं.च्या ८अ उताऱ्यावर घरकूल निधीचा लाभघेतला आहे. १२६/१,२,३ ही जागा अद्यापही बखळ आहे. ही जागा रोटे यांच्या वडिलांच्या नावे आहे. याच जागेवर त्यांनी भाऊ आणि त्यांच्या
पत्नीच्या नावेही घरकूल योजनेच्या लाभघेतला आहे. शासनाच्या गाय गोठा योजनेचाही लाभ घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार पंकज रामधन रोटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, तर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले. या जागेवर घरकुलाचे बांधकाम अर्धवट असून, गाय गोठा दिसत नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.
*४ लाख २० हजारांचा अपहार?*
राहुल रोटे हे दि. ११ फेब्रुवारी २०२१ पासून ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि आता प्रभारी सरपंचपदावर कार्यरत आहेत
त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत कल्पना राहुल रोटे, रामधन अप्पा रोटे, वैशाली रामधन रोटे, गौतम रोटे व दीपाली गौतम रोटे यांचे नावे घरकूल, तसेच गाय गोठ्याच्या निधीचा लाभ घेऊन शासनाच्या निधीचा अपहार केला आहे.
यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंकज रामधन रोटे यांनी केली होती.
याप्रकरणी रोटे यांनी हडप केलेली शासकिय निधी ची रक्कम 10
दिवसांच्या आत योजनेतील ही रक्कम शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१८ जून रोजी दिले आदेश
दि. १८ जून २०२५ रोजी घरकूल आणि गाय गोठा योजनेची रक्कम दहा दिवसांच्या आत शासन जमा करण्याचे निर्देश दिले, तसेच याप्रकरणी दोषी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत.
याप्रकरणी काय कारवाई होते याकडे तालुक्यासह जिल्हावासियांचे लक्ष लागुन आहे.