
शरीराने अपंग, पण देशभक्तीने तेजस्वी; जळगावच्या मुकुंद गोसावी यांची पंतप्रधानांना युद्धसेवेची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – “शरीराने मी पोलिओमुळे अपंग असलो तरी मनाने पूर्ण सक्षम आहे. भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मला मातृभूमीसाठी रणांगणात लढण्याची संधी द्यावी,” अशी भावनिक मागणी जळगावचे रहिवासी व रक्तदान सेवेत कार्यरत असलेले मुकुंद गोसावी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गोसावी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “शत्रूशी लढताना मी काही प्रमाणात तरी त्यांची ताकद कमी करू शकेन. आणि नशिबाने वीरमरण आले, तरी माझ्या शरीराने शत्रूच्या गोळ्या, बारूद काही प्रमाणात शोषून देशाचे रक्षण होईल.” अवयव दान, रक्तदान, तन-मन-धनाने निरपेक्ष देशसेवा करण्याची त्यांची तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
रक्तदान सेवेत सक्रिय कार्य करणारे मुकुंद गोसावी यांचे हे निवेदन देशभक्तीचा अद्वितीय आदर्श असून त्यांनी दाखवलेली भावना समस्त नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. देशासाठी प्राण पणाला लावण्याची ही इच्छाशक्ती लक्षवेधी ठरत आहे.