सुट्टीचा आनंद जीवावर बेतला ! धरणात बुडून जळगावचा तरुण बेपत्ता, एकाला मानवी साखळी करून वाचविले !

सुट्टीचा आनंद जीवावर बेतला ! धरणात बुडून जळगावचा तरुण बेपत्ता, एकाला मानवी साखळी करून वाचविले !
सावखेडासिमजवळील निंबादेवी धरण परिसरातील घटना
प्रतिनिधी | यावल l महापोलीस न्यूज l यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळील निंबादेवी धरणात अंघोळीसाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी १८ वर्षीय जतीन अतुल वार्डे हा खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला. सुदैवाने, दुसऱ्या एका तरुणाला मित्रांनी वाचवले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
जळगावच्या रामेश्वर कॉलनीतील आठ तरुण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निंबादेवी धरणावर गेले होते. अंघोळीदरम्यान जतीन खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याचवेळी आणखी एक तरुणही बुडत असल्याने त्याला मित्रांनी त्वरित मानवी साखळी बनवून त्याला केसांना धरून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिसांना कळवले. सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होणार आहे.
धरण परिसरात जाण्याचा धोका
पावसाळ्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. शिवाय, रस्त्यांची दुरवस्था आणि अपघाताचा धोका यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे, असा इशारा यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे. असे कृत्य केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.सुरक्षितता प्रथम!
नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणांऐवजी सुरक्षित ठिकाणी सुट्टीचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.