“एक दीन, एक घंटा, एक साथ – राष्ट्र स्वच्छता अभियान”

जळगाव (प्रतिनिधी) दि. २५ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या सभागृहात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त “एक दीन, एक घंटा, एक साथ – राष्ट्र स्वच्छता अभियान” अंतर्गत स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककांतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात आता ५ लाखांवर पोहोचली आहे. या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना समाजातील समस्या समजतात व भविष्यात योग्य निर्णय घेऊन आदर्श नागरिक होण्यास मदत मिळते’’. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याची माहिती देत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी महत्त्व अधोरेखित केले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात आयोजित स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येत असून सर्वांनी यात भाग घेण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. तसेच वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसराची स्वच्छता राखण्यावरही भर देण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास दांडगे, मनोज इंगोले व डॉ. कविता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर विद्यापीठ परिसरात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.






