काय म्हणताय! जळगांव पासून थोड्याच अंतरावर स्वर्ग आहे.

रविवार विशेष: राकेश वाणी –
अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता ऋतू म्हणजे ‘पावसाळा’ आणि या ऋतुमध्ये निसर्ग जेव्हा हिरवा शालू पांघरतो, पांढऱ्या शुभ्र मोतीसारखे बरसणारे मेघ, हाताने स्पर्श करून ढगासोबत गप्पा. हेच तर आहे पृथ्वीवरचे ‘स्वर्ग’ चला तर मग आपल्या अगदी जवळ आणि स्वर्ग सुख देणाऱ्या काही निसर्गरम्य ठिकाण कोणती आहेत ते जाणून घेऊया.
. 1) हरिहर गड – नाशिक पासून अवघ्या 40 किमी. अंतरावर असलेले ‘हरिहर गड’ या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे चढायला 90° डिग्री रस्ता आहे, मुळात रस्ताच नाही आहे, कुठेही भक्कम असा सपोर्ट पकडायला जागा नाही, भीती, थरार, आणि मनमोहक निसर्ग याची उत्तम संगम म्हणून या गडाची ओळख आहे, तसेच ट्रेकिंग करणाऱ्या युवकांना विशेष भुरळ घालणारे हे एक उत्तम ठिकाण आहे.
. 2) हरिश्चन्द्र गड – नाशिक पासून अवघ्या 100 किमी. अंतरावर असलेले ऐतिहासिक आणि निसर्गाचा उत्तम नमुना असलेले ठिकाण म्हणजे ‘हरिश्चन्द्र गड’.
येथील सर्वात उंच पॉईंट म्हणजे कोकणकडा आणि या ठिकाणी पोहचायला किमान 2 तासाचा प्रवास करावा लागतो. आणि या प्रवासात तुम्हाला 10 पेक्षा जास्त लहान-मोठे धबधबा, पाण्याने तुडुंब वाहणारे ओढे, ढग, विविध प्राणी, पक्षी बघायला मिळतील. तसेच वर गेल्यावर ऐतिहासिक महादेवाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल जिथे आहेत चार युगाचे स्तंभ.
. 3) पांडव लेणी – नाशिक शहराला लागून असलेले महाभारत काळातील ‘पांडव लेणी’ बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना, संपूर्ण डोंगरात कोरीव काम करून बनवलेला, निसर्गाची शाल ओढून स्वतःची सुंदरता द्विगुणित करणारा पृथ्वी वरील जणु दुसरा स्वर्ग म्हणायला काही हरकत नाही.
. 4) अजिंठा लेणी – जळगांव पासून अवघ्या 50 किमी अंतरावर असलेले ऐतिहासिक स्थळ जिथे जगभरातून लाखो पर्यटक भेट देतात, व जागतिक स्तरावर ज्या पर्यटन स्थळाचे नावं घेतले जाते असे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ‘अजिंठा लेणी’.
सुमारे 29 लेण्या तसेच भगवान बुध्दाच्या विविध भावमुद्रा याठिकाणी पाहायला मिळतात. व संपूर्ण परिसर जणू निसर्गाने केलेली एक अतुलनीय किमया आहे, पावसाळ्यात ठिकठिकाणी आपल्याला धबधबा, तुडुंब भरून वाहणारे ओढे, प्राणी, पक्ष्यांचा किलबिलाट जणू मानसिक ताण कमी करणारा चमत्कार म्हणायला हरकत नाही. तसेच या ऋतू मध्ये अजिंठा पाहण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी जमा होते.
मग तुमच्या परिवारासोबत कुठल्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचं बेत आखता आहात. आम्हाला कळवा आणि भेट दिल्यावर आम्हाला आपला अभिप्राय नक्की कळवा, तुम्हाला पृथ्वीवर स्वर्गसूख अनुभवायला मिळाले कि नाही!!
📌 महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी मुळे प्रतिबंध केलेल्या स्थळावर भेट देणे स्वतःच्या जीवाशी खेळ आहे, तरी निर्बंध केलेल्या पर्यटन स्थळी कुणीही जावू नये.