
महा पोलीस न्यूज । मिलींद शेटे । केळी उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी रावेर येथे केळी तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकाराने या केंद्राच्या स्थापनेसंदर्भात कृषी तज्ज्ञांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत हे केंद्र प्रस्तावित असून, या संदर्भात भालोद येथील केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, कृषी विज्ञान केंद्र (जळगाव) चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, आणि तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहात यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान, केंद्राची कार्यपद्धती, शेतकऱ्यांसाठीची गरज आणि उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत विशेषतः पनामा रोगावर नियंत्रण, भविष्यातील संशोधन, आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन कसे पुरवता येईल यावर भर देण्यात आला. तसेच, आधुनिक शेती पद्धती, पीक सल्ला, बियाणे निर्मिती, आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सुविधा यांसारख्या विषयांवरही सखोल विचारमंथन झाले.
याशिवाय, यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या परिसरात दर महिन्याच्या एका गुरुवारी “शेतकरी संवाद कार्यक्रम” आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कृषी अधिकारी आणि तज्ज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांवर उपाय देतील. यामुळे रावेर परिसरातील केळी उत्पादकांना वैज्ञानिक माहिती सहज उपलब्ध होईल, उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि शेती अधिक फायदेशीर बनेल, अशी अपेक्षा आहे.