बनावट दस्ताऐवजाद्वारे अतिक्रमण; जागा सोडण्यासाठी मागितली एक कोटींची खंडणी

बनावट दस्ताऐवजाद्वारे अतिक्रमण; जागा सोडण्यासाठी मागितली एक कोटींची खंडणी
जळगाव (प्रतिनिधी): जमिनीच्या व्यवहारात बनावट दस्ताऐवज तयार करून शेजारच्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याचा प्रकार जिल्हा पेठेतील टी.पी. स्कीममध्ये उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या अतिक्रमित जागेवरून ताबा सोडण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी विमल आत्माराम वाणी, तुषार आत्माराम वाणी आणि श्रीकांत आत्माराम वाणी (सर्व रा. गुरुद्वाराच्या मागे) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरेदीखतात ६३.८ चौ.मी., दस्ताऐवजात ५७७.७ चौ.मी. दाखवले
अॅड. पंकज पांडुरंग काळे (वय ४७, रा. ओंकार नगर) यांचे वडील यांनी टी.पी. स्कीम क्र. २ मधील प्लॉट नं. २६९ खरेदी केला होता. या प्लॉटला लागून असलेल्या प्लॉट नं. २६५ मध्ये विमल वाणी यांनी १४ फेब्रुवारी १९८० रोजी केवळ ६३.८ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा खरेदी केली होती. मात्र, त्यानंतर १८ एप्रिल १९८० रोजी त्यांनी बनावट दस्ताऐवज तयार करून त्यात प्लॉटचे क्षेत्रफळ तब्बल ५७७.७ चौ.मी. दाखवले आणि त्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात केली.
काळे यांच्या प्लॉटवर अतिक्रमण; बेकायदेशीर बांधकाम
या बनावट कागदपत्रांच्या आधारे वाणी कुटुंबीयांनी अॅड. काळे यांच्या प्लॉट नं. २६९ मधील काही भागावर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केले. यावर अॅड. काळे यांनी वेळोवेळी आक्षेप नोंदवला असता, तुषार वाणी आणि श्रीकांत वाणी यांनी जागा खाली करण्यासाठी एक कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.
खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
या खंडणीच्या मागणीनंतर अॅड. पंकज काळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करत आहेत.