
यावल प्रतिनिधी ! तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या ८ वर्षांपासून उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेखर बशारत तडवी यांची आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर अंधारमळी (ता रावेर) येथे बदली झाली असून त्यानिमित्ताने आज दि.१७ सप्टेंबर बुधवार रोजी एका घोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भावनिक वातावरण निर्माण होऊन “सर नका जाऊ हो” असा एकच टाहो विद्यार्थ्यांनी फोडला.
दरम्यान सदरील कार्यक्रमात मुख्याध्यापक विजया पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमजान तडवी,समिती सदस्य दिलीप तायडे,शिक्षण तज्ञ अनिल पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला.प्रसंगी उपशिक्षक शेखर तडवी यांनी आपल्या घोटेखानी काल खंडावर प्रकाश टाकतांना सेवा बजावतांना आलेला अनुभव,अडीअडचणी व शिक्षकांचे व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचे तसेच अधिकारी वर्गाचे सहकार्य विषद केले.तसेच आपल्या शालेय जीवनातील प्रशासन काळात विद्यार्थ्यांसोबत जुडलेली नाड याबाबत अनुभव सांगत असतांना उपस्थित मान्यवर,शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी “नका जाऊ हो सर” हि साद विद्यार्थ्यांनी धरल्यामुळे शाळेतील एकूणच वातावरण फारच भावनिक झाले व तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकच आक्रोश केला.सदरील वातावरण हे शाळेपुरते मर्यादित न राहता काही विद्यार्थी व विद्यार्थिनी घरापर्यंत रडत राहील्या हे विशेष !.
सदर निरोप समारंभ प्रसंगी मुख्याध्यापिका विजया पाटील,ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,शिक्षण तज्ञ अनिल पाटील,उपशिक्षक शेखर तडवी,शिक्षिका ज्योती भादले,मोहिनी पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान तडवी,उपाध्यक्षा आसमा तडवी,सदस्य शरीफा तडवी,संजय बऱ्हाटे,कल्पना धनगर,संजय आढाळे,दादाराव पांडव यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.






