CrimeOtherSpecial

पोलीस बदली प्रक्रिया : तुम्ही पात्र असाल तर ही बातमी जरूर वाचा. असे आहेत निकष..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । राज्यातील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संपल्या असून त्याखालील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील बदलीचे वारे झोम्बू लागले आहेत. पोलीस अधीक्षक पुढील आठवड्यात बदल्यांना सुरुवात करणार असल्याची चर्चा असून यंदा बदली करताना पोलीस बदली समितीने काही निकष निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निकषानुसार बदली झाल्यास अनेकांची गोची होणार असून वर्षानुवर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्यांना खरोखर कर्तव्य बजावावे लागणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बदली करताना व्हिडीओ कॉन्फरन्सचा उपयोग करून बदलीपात्र कर्मचाऱ्यांना विचारणा करून पसंतीचे ठिकाण देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि सोबत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर या सदस्य असणार आहेत.

विभागात १० वर्ष झाल्यास दुसऱ्या विभागात बदली
जळगाव जिल्ह्यातील कितीतरी कर्मचारी आपले राजकीय वजन वापरून अनेक वर्ष एकाच विभागात काम करीत आहे. नियमानुसार १० वर्ष एका विभागात (डिव्हिजन) मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात बदली करण्यात येते. यंदा तोच निकष लावला जाणार आहे. तसेच पोलीस ठाणे म्हणून कुठेही काम न केलेल्या आणि पहिलीच पोस्टिंग असलेल्यांची इतर पोलीस ठाण्यात बदली केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर आपला रहिवासी तालुका (नेटिव्ह टाऊन) च्या ठिकाणी कुणालाही बदली दिली जाणार नाही. पोलिसांच्या दृष्टीने तिन्ही निकष अवघड असले तरी पोलिसिंग आणि शिस्तीच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत.

महिला कर्मचाऱ्यांना देखील मिळणार पोलीस ठाणे
जळगाव जिल्ह्यात शेकडो महिला कर्मचारी कार्यरत असताना आजही जवळपास १० पोलीस ठाण्यात एकही महिला कर्मचारी कार्यरत नाही. तसेच ७-८ पोलीस ठाण्यात केवळ १ आणि २ महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांविषयीक गुन्हे, आंदोलन, उपोषण हाताळताना महिला पोलीस कर्मचारी आवश्यक असतात मात्र बऱ्याच महिला कर्मचारी पोलीस ठाण्यातील नेमणूक टाळतात. यंदाच्या बदली आदेशात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सेवानिवृत्तीवाल्यांची मज्जा, मुख्यालय मुक्कामी असलेल्यांना दणका
पोलीस दलातील कितीतरी पोलीस कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होत असतात. पुढील वर्षभरात देखील अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्तीच्या काळात कोणताही कर्मचारी आपल्या आवडीच्या ठिकाणी किंवा आहे त्याच ठिकाणी कार्यरत राहणे पसंत करतो. बदली प्रक्रिया राबवताना पोलीस अधीक्षक यंदा पुढील वर्षभरात सेवानिवृत्ती असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ वर्ष स्थगिती किंवा पसंतीच्या ठिकाणी बदली देणार असल्याची चर्चा आहे. तसेच शेकडो कर्मचारी वर्षानुवर्ष पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहे. यंदा बदली प्रक्रिया राबवताना मुख्यालयातील जवळपास १५० पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात नेमणूक केली जाणार आहे.

एलसीबीला ‘नो एन्ट्री’
दरवर्षी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)ला आपली वर्णी लावून घेण्यासाठी शेकडो पोलीस कर्मचारी इच्छुक असतात. एलसीबीमध्ये नेमणूक मिळावी म्हणून सर्वाधिक चुरस असते आणि त्यासाठी राजकीय वशिला आणि दबावाचा देखील वापर केला जातो. गेल्या वर्षी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीमध्ये जम्बो भरती केली होती. वर्षभरात त्यातील काहींची उचल बांगडी देखील झाली. एलसीबीसाठी इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता बदली आदेशात कुणाचीही नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.

पोलीस ठाण्यांना मिळणार अंमलदार, दुसऱ्याच दिवशी सुट्टी
पोलीस दलाचे कामकाज अधिक सुलभ आणि आधुनिक करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. गुन्हे निर्गती लवकरात लवकर होण्यासाठी तपासी अंमलदाराची आवश्यकता असते. यंदाच्या बदली प्रक्रियेत प्रत्येक पोलीस ठाण्यात तपासी अंमलदार देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. यावर्षी बदलीस पात्र असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडील प्रलंबित कामे आणि तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे प्रभारींना महिन्याभरापूर्वीच कळवण्यात आले आहे. त्यामुळे बदलीचे आदेश प्रसिद्ध होताच त्यांची त्या पोलीस ठाण्यातून सुट्टी केली जाणार असून दुसऱ्याच दिवशी कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे.

लहान मुले, पालकांच्या आजारपणाचे कारण नको
पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याचे आई-वडील वयोवृद्ध किंवा मुले लहान आहेत. लहान मुले आणि वयोवृद्ध पालकांना आजारपण असते. बरेच कर्मचारी बदली टाळण्यासाठी लहान मुलांचे किंवा पालकांचे कारण देत असतात. यंदा बदली प्रक्रियेत असे कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही. कुणी कर्मचारी स्वतः, पत्नी किंवा मुले जास्त गंभीर आजाराला सामोरे जात असतील तरच त्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा किंवा स्थगितीचा विचार केला जाणार आहे.

शिफारस करताना घ्यावी काळजी
जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. पसंतीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी किंवा स्थगितीसाठी पोलीस कर्मचारी अधीक्षकांवर राजकीय दबाव आणतात अथवा काहीतरी कारणे देतात. बदली व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पोलीस प्रशासनाने सध्या निश्चित केलेल्या निकषांचा विचार करूनच पोलिसांनी प्रयत्न करावे अथवा कुणाची शिफारस आणावी. पोलीस अधिक्षकांकडून कुणालाही नाराज केले जाण्याची शक्यता नसली तरी निकषांच्या विरोधात जास्तच प्रयत्न करणाऱ्यांना लांब कुठेतरी नेमणूक मिळण्याची शक्यता जास्त आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button