अमळनेरमध्ये गोवंश निर्दयीपणे वाहतूक करणारी दोन वाहने पकडली; ४ गोवंश सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

अमळनेर (पंकज शेटे): शहरातील सुभाष चौक आणि तेली भवन परिसरात गोवंश अत्यंत निर्दयीपणे आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ गोवंश सुटका केली असून, दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुभाष चौक आणि तेली भवन जवळ सापळा लावून दोन संशयित वाहनांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान, टाटा कंपनीची गाडी (क्र. MH-18-AA-4261) आणि महिंद्रा सुप्रो कंपनीची गाडी (क्र. GJ-26-T-7446) या दोन्ही वाहनांमध्ये एकूण ४ गोवंश अत्यंत दाटीवाटीने, चारा-पाण्याची कोणतीही सोय नसताना बांधलेले आढळले. या जनावरांना निर्दयीपणे कत्तलीच्या उद्देशाने किंवा अवैध वाहतुकीसाठी नेले जात असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिस कारवाई आणि जप्त मुद्देमाल
या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
* ४ गोवंश: ज्यांची अंदाजे किंमत ४८,००० रुपये आहे.
* दोन वाहने: टाटा आणि महिंद्रा कंपनीच्या गाड्या, ज्यांची किंमत ४,६०,००० रुपये आहे.
* एकूण मुद्देमाल: ५,०८,००० रुपये.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी खालील संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे:
१. अबरार जहूर शेख (वय २५ वर्ष, रा. शिरपूर, जि. धुळे)
२. सतिश कैलास थोरात (वय ३५ वर्ष, रा. शिरपूर, जि. धुळे)
कायदेशीर कारवाई
या दोन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(d), ११(१)(e), ११(१)(f), ११(१)(c) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय युवराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विनोद भोई या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत






