बसमधील दागिने चोरीचा छडा : दोन महिलांना अटक, दागिने हस्तगत!

बसमधील दागिने चोरीचा छडा : दोन महिलांना अटक, दागिने हस्तगत!
अमळनेर: प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून सुमारे आठवडाभराच्या शोधमोहीमेनंतर दोन महिलांना अटक केली असून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक ६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता, तक्रारदार प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे, ता. धरणगाव) या धरणगाव येथून जळगाव-दोंडाईचा बसने वाघोदे (ता. शिंदखेडा) येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी पाकिटात ठेवलेले दोन सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र त्यांच्या पर्समध्ये सुरक्षित ठेवले होते.
बसमध्ये त्यांच्याजवळ दोन अनोळखी महिला बसलेल्या होत्या. अमळनेरच्या चोपडा नाका स्टॉपवर त्या महिला उतरल्यानंतर तक्रारदारांनी पर्स तपासली असता सोन्याचे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्वरित शोध घेऊनही दागिने न सापडल्याने त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते आणि परी पोलीस उप-अधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथक तैनात करण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता, चोरी करणाऱ्या महिला सतत आपले वास्तव्य बदलत असल्याचे आढळून आले. त्या जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा तसेच मध्य प्रदेशातील तिगाव, पांडुरणा आणि इंदूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होत्या. पोलिसांनी सातत्याने पाठलाग करून अखेर वरुड (ता. वरुड, जि. अमरावती) येथे आठवडी बाजार भागात आरोपींना अटक केली.
गंगा चैना हातगळे (वय ४०, रा. नेताजी नगर, यवतमाळ)
गंगा सुभाष नाडे (वय ४५, रा. नेताजी नगर, यवतमाळ) या दोन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
गेल्या ८ ते ९ दिवसांपासून पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न केले. गोपनीय माहितीचा आधार घेत आणि तांत्रिक साधनांचा वापर करून अखेर पोलिसांनी या गुन्हेगारांना गजाआड केले. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये विश्वास वाढला असून, पोलिसांच्या तडफदार तपासामुळे अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी मोठे यश मिळाले आहे.