अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या
आमदार अमोलभाऊ जावळे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
जळगाव प्रतिनिधी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात रावेर–यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.
यावल–रावेर मतदारसंघात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, उडीद, मूग व कपाशी ही पिके पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने योग्य व पुरेशी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देणे अत्यंत गरजेचे असून शासनाने या गंभीर प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.






