जुन्या वादातून टोळक्याचा घरावर हल्ला, गल्लीतील दुचाकींची तोडफोड

महा पोलीस न्यूज | ८ एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात धक्कादायक घटना घडली असून जुन्या वादातून टोळक्याने एकाच्या घरावर हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी घरावर दगडफेक करीत घरात घुसून सामानाची तोडफोड केली आहे. इतकंच नव्हे तर परिसरातील दुचाकींचे देखील नुकसान करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादीनुसार, तुकाराम वाडी परिसरातील हनुमान मंदीराजवळ अरुण भिमराव गोसावी यांचे घर आहे. २०२२ मध्ये अरुण गोसावी आणि सुरेश ओतारी यांना काही तरुणांनी मारहाण केली होती. मारहाणीत सुरेश ओतारी याचा मृत्यू झाल्याने गोसावी यांनी ५ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यात ५ संशयीत आरोपींना अटक देखील करण्यात आली होती.
दि.६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास अरुण गोसावी हे परिवारासह घरात असताना भुषण माळी उर्फ भाचा, आकाश ठाकूर उर्फ खंड्या, पवन बाविस्कर उर्फ बद्या, सचिन चौधरी उर्फ टिचकुल्या, आकाश मराठे उर्फ ब्रो, चेतन सुशिर उर्फ बटाट्या यांनी गोसावी यांच्या घरावर हल्ला केला. सर्वांनी घरावर दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी सामानाची तोडफोड केली. यावेळी भुषण माळी याने ‘ तू कसा आमच्या विरुद्ध केस चालवतो, तुला बघतो, आज तुझा मर्डरच करतो’ अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर सर्वांनी आपला मोर्चा घराच्या पहिल्या माळ्याच्या दिशेने नेला.
हल्लेखोरांच्या हातात कोयता आणि लाठ्याकाठ्या असल्याने अरुण गोसावी यांनी घराच्या मागील दरवाज्याने आपला जीव वाचवत पळ काढला. संशयितांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून घरातील सामानाची देखील तोडफोड केली. याप्रकरणी अरुण गोसावी यांनी रविवारी एमआयडीसी पोलीस फिर्याद दिल्यावरून भुषण माळी उर्फ भाचा, आकाश ठाकूर उर्फ खंड्या, पवन बाविस्कर उर्फ बद्या, सचिन चौधरी उर्फ टिचकुल्या, आकाश मराठे उर्फ ब्रो, चेतन सुशिर उर्फ बटाट्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र वाघमारे हे करीत आहेत.
दरम्यान, शनिवारी रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास तुकाराम वाडी परिसरातील १५ ते २० दुचाकींची तोडफोड करण्यात आली असून वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. तोडफोडीचा प्रकार देखील याच गुन्ह्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले असून तपास सुरू आहे.