PoliticsSocial

ब्रेकिंग : २६४ नगरपालिका व नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्रातील एकूण २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मंगळवार, २ डिसेंबर रोजी राज्याच्या विविध भागांत मतदान होत आहे. तब्बल ८ ते १० वर्षांनंतर या निमशहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात असल्याने मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, मतमोजणी एकत्रित २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. एकूण १२,३१६ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून, त्यासाठी ६२,१०८ निवडणूक अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, जेणेकरून मतदान शांततेत व पारदर्शकपणे पार पडेल.

मतमोजणी एकाच दिवशी : हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचा अर्थ आज २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची मतमोजणीही २१ डिसेंबरलाच होईल, तर यापूर्वी २० डिसेंबरला होणाऱ्या उर्वरित नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणीही त्याच दिवशी घेतली जाईल.

एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही
न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहील आणि कोणत्याही माध्यमाला किंवा संस्थेला एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही. ही याचिका काही राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी दाखल केली होती, ज्यात दोन्ही टप्प्यातील मतमोजणी एकाच वेळी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

दोन टप्प्यातील निवडणुका
पहिला टप्पा : २ डिसेंबर (आज) – अनेक नगरपालिका व नगरपंचायती
दुसरा टप्पा : २० डिसेंबर – उर्वरित नगरपालिका व नगरपंचायती
दोन्ही टप्प्यातील मतमोजणी आता २१ डिसेंबरला एकत्र होणार असल्याने राजकीय पक्षांना आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. एकाच दिवशी निकाल जाहीर झाल्याने संपूर्ण राज्यातील चित्र एका दिवसात स्पष्ट होईल.

राजकीय पक्षांची धडपड
महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना उबट), महायुती (भाजप-शिंदे गट-अजित पवार गट) तसेच इतर स्थानिक पातळीवरील आघाड्या व अपक्ष उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे. अनेक ठिकाणी थेट आमदार-खासदारांनी प्रचारात उतरून आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मतदान याचना केली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, स्थानिक विकासकामे आणि जातीय समीकरणे या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

मतदारांमध्ये उत्साह
गेल्या अनेक वर्षांपासून या नगरपालिका-नगरपंचायती बरखास्त किंवा प्रशासकाखाली होत्या. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या भागाचा कारभार थेट निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे सोपवण्याची संधी मतदारांना मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

आज सील होणार मतदान यंत्रे
आज संध्याकाळी ५.३० वाजता मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे (EVM) सील करून सुरक्षित ठिकाणी ठेवली जातील आणि २१ डिसेंबरला एकाच वेळी संपूर्ण राज्यातील मतमोजणी होईल. या निवडणुकीकडे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्य पातळीवरील राजकारणाच्या दृष्टीनेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button