१५ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेऊन युवकाचा गोळ्या झाडून खून !

१५ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेऊन युवकाचा गोळ्या झाडून खून !
वाकटुकी फाट्यावरील घटना ; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
जळगाव | प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्यावर मंगळवारी २२ रोजी रात्री एका ४० वर्षीय युवकावर गावठी पिस्तुलातून बेछूट गोळीबार करत थरारक हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या २०१० साली झालेल्या एका खुनाचा बदला म्हणून केल्याची माहिती समोर आली आहे.
मृत युवकाचे नाव गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) असे आहे. ते आपल्या कुटुंबासह गावात राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, सन २०१० मध्ये गोपाळ मालचे यांच्यावर एका खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि ते प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास गोपाळ मालचे हे वाकटुकी फाट्यावर आले असता, राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) या युवकाने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी थेट डोक्यात लागल्याने गोपाळ मालचे यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सावंत याचे वडील ज्ञानेश्वर सावंत यांचा २०१० मध्ये खून झाला होता. गोपाळ मालचे यांनीच त्यांच्या वडिलांचा खून केला होता, असा राहुलचा आरोप असून, त्याचा सूड घेण्यासाठीच ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.
गोळीबारानंतर राहुल सावंत स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला, व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे धरणगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून,पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.