रावेर मतदारसंघातील एकही नागरिक आयुष्मान कार्डाविना राहता कामा नये – आमदार अमोल जावळे

रावेर मतदारसंघातील एकही नागरिक आयुष्मान कार्डाविना राहता कामा नये – आमदार अमोल जावळे
प्रतिनिधी l “माझ्या मतदारसंघातील एकही नागरिक आयुष्मान भारत कार्डाविना राहू नये, जे पाणंद रस्ते नकाशावर दाखल नाहीत त्यांचे मॅपिंग करून क्रमांक देण्यात यावेत आणि घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. या तिन्ही बाबी मिशन मोडमध्ये पूर्ण व्हाव्यात,” असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला दिले.
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या निमित्ताने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने रावेर तालुक्यातील फैजपूर विभागीय कार्यालयात सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
पाणंद रस्त्यांचे मॅपिंग आणि लोकसहभाग
बैठकीत आमदार अमोल जावळे यांनी सांगितले की, जे पाणंद रस्ते नकाशावर दाखल नाहीत त्यांचे मॅपिंग करून क्रमांक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेतशिवार फेऱ्या घेऊन शेतकऱ्यांना सहभागी करणे आवश्यक आहे.
घरकुल लाभार्थी आणि आयुष्मान कार्ड मोहिमेला गती
घरकुल योजनेत ज्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यांना घरासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह आमदारांनी व्यक्त केला. तसेच आरोग्याच्या दृष्टीने एकही नागरिक वंचित राहू नये म्हणून येत्या १५ दिवसांत मिशन मोडमध्ये आयुष्मान भारत कार्ड वितरण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, रावेर गटविकास अधिकारी विनोद मेढे, यावल गटविकास अधिकारी मंजुश्री बोरसे तसेच दोन्ही तालुक्यांचे नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार अमोल जावळे यांनी बाल संगोपन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. रावेर मतदारसंघातील सर्वाधिक प्रकरणे मंजूर झाल्या वबद्दल त्यांनी विभागाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.






