Crime

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात ‘रेड अलर्ट’; मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात ‘रेड अलर्ट’; मुसळधार पावसाचा इशारा

सातारा, सांगलीसह अनेक भागांत ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट; प्रशासन सतर्क

पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा-सांगलीला ‘ऑरेंज’, तर अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

सातारा आणि सांगली जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह अनेक जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

मुंबई-पुण्यात पावसाची हजेरी

शुक्रवारी पहाटेपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून, काही भागांत रिमझिम पावसाची नोंद झाली आहे. तर पुणे शहरात गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पिंपरी चिंचवड, हडपसर, कोंढवा परिसरात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

मान्सून लवकर दाखल; शेतकऱ्यांमध्ये समाधान

यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर दस्तक दिली असून, मे अखेरीसच कोकण, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार सुरुवात केली होती. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. सध्या पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने पेरण्यांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

मराठवाडा-विदर्भात वीजसह मुसळधार पावसाचा तडाखा

मराठवाडा व विदर्भातही जोरदार पावसासह विजांचा कडकडाट सुरू असून, जालना जिल्ह्यातील मंठा येथे विजेचा धक्का बसून एका ४२ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याचे प्रकार घडले आहेत.

दरडी कोसळण्याचा धोका; पर्यटकांनी सावध राहावं

कोकणातील घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, आणि सुरक्षित स्थळीच निवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button