PoliticsSocial

विषमुक्त शेतीचा महामार्ग: मुक्ताईनगरच्या राजेंद्र कांडेलकर यांची यशोगाथा

विषमुक्त शेतीचा महामार्ग: मुक्ताईनगरच्या राजेंद्र कांडेलकर यांची यशोगाथा

सेंद्रिय शेतीतून पर्यावरण रक्षण आणि ग्रामीण रोजगार निर्मितीचा अनोखा संगम

मुक्ताईनगर – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून कृषी क्षेत्रात यशाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून त्यांनी रासायनिक शेतीपासून दूर जात, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी शेतीचा स्वीकार केला आहे. याच अनुभवातून त्यांनी निंबोळीपासून जैविक कीटकनाशक तयार करत ‘जय भोले नीम शक्ती अ‍ॅग्रो’ या नावाने लघुउद्योग सुरू केला.

शाश्वत उत्पादनाची दिशा
कांडेलकर यांनी पंजाब व नैनीताल येथे प्रशिक्षण घेऊन निंबोळी तेल, अर्क आणि पावडर तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या उत्पादनामध्ये ३५% शुद्ध निंबोळी अंश असतो, जो बाजारातील इतर उत्पादनांपेक्षा प्रभावी ठरतो. सध्या तांत्रिक कारणामुळे उत्पादने वितरणात थोडी अडचण असली, तरी लवकरच ती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.

रोजगार आणि पर्यावरणाचे संरक्षण
सुमारे ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहिलेल्या या लघुउद्योगातून आज ७-८ जणांना रोजगार मिळाला आहे. ठिबक सिंचनाद्वारे फवारणीस योग्य अशा या जैविक कीटकनाशकामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होतो, तर पर्यावरणही सुरक्षित राहते.

दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास
सध्या नाशिक, अकोला, बुलढाणा, मध्यप्रदेश या भागांतील दीड ते दोन लाख शेतकरी त्यांच्या उत्पादनांचा वापर करत आहेत. केळी, द्राक्ष, हळद, संत्री अशा नगदी पिकांमध्ये हे जैविक उत्पादने उपयोगात आणले जात आहेत.

प्रशासनाचा सन्मान
शेती आणि जैविक उत्पादनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषी पुरस्काराने गौरवले आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांना अनुदान व मार्गदर्शनही मिळाले.

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार हे कांडेलकर यांचे आणखी एक महत्त्वाचे योगदान आहे. विविध कृषी प्रदर्शनांतून, प्रत्यक्ष संवादातून आणि प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून त्यांनी इतर शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळवले आहे.

यशाचा मूलमंत्र
राजेंद्र कांडेलकर यांचा प्रवास केवळ शेतीपुरता मर्यादित नसून, तो आरोग्यदायी अन्न, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण उद्योगशीलतेच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने अशा यशस्वी प्रयोगांचा प्रचार-प्रसार करावा, अशी शेतकऱ्यांतून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button