OtherSocial

शेतकरी-व्यापाऱ्यांचे आंदोलन : तथाकथित गोरक्षकांच्या अन्यायाविरोधात गुरे खरेदी-विक्री बाजार बंद

महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि गुरांचे व्यापारी यांनी तथाकथित गोरक्षक आणि काही व्यक्तींकडून होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात २० जून २०२५ पासून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुरांच्या खरेदी-विक्री बाजार बंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी निवेदन सादर करून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

शेतकरी आणि व्यापारी यांनी निवेदनात म्हटले आहे की, जळगाव, चोपडा, धरणगांव, पारोळा, वरखेडी, नगरदेवळा, चाळीसगाव, नेरी, वाकोद, सावदा यासह जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुरे खरेदी-विक्रीसाठी जाताना तथाकथित गोरक्षक आणि काही व्यक्तींकडून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. रस्त्यावर वाहने अडवून चालक आणि प्रवाशांना शिवीगाळ, मारहाण, पैसे आणि मोबाइल हिसकावणे, तसेच गुरे बळजबरीने घेऊन गोशाळांमध्ये बेकायदेशीरपणे टाकणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की, शेतकरी आणि व्यापारी गुरांच्या खरेदी-विक्रीचे पुरावे आणि पावत्या सादर करत असतानाही पोलिसांकडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. गोशाळांमध्ये टाकलेली गुरे नंतर आढळून येत नाहीत, आणि तिथून गुरांची अवैध विक्री होत असल्याचा गंभीर आरोपही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केला आहे. याशिवाय, गोशाळांकडून गुरांच्या चारा-पाण्यासाठी अवास्तव रकमेची मागणी केली जाते, ज्यामुळे गुरे मालकांना गुरे सोडून देण्यास भाग पाडले जाते.

पोलिसांवर बेकायदेशीर कृत्य आणि संगनमताचा आरोप
निवेदनात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतरही तथाकथित गोरक्षक आणि काही व्यक्ती पोलिसांना चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करवतात. पोलिस अधिकारी पुरावे असतानाही गुरे मालकांवर बेकायदेशीरपणे कारवाई करतात आणि गुरे गोशाळांमध्ये टाकतात. हे प्रकार तथाकथित गोरक्षक, काही व्यक्ती आणि गोशाळा मालक यांच्या संगनमताने होत असल्याचा दावा निवेदनात आहे.

शेतकरी-व्यापाऱ्यांची मागणी
शेतकरी आणि व्यापारी यांनी या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि शांतता व जाती सलोखा राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, गुरे खरेदी-विक्रीचे पुरावे असलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची लेखी हमी दिल्यास ते बंद आंदोलन मागे घेतील. यासाठी पोलिस प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत पत्रव्यवहार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

आंदोलनाचा जिल्ह्यात परिणाम
आंदोलनामुळे जळगाव जिल्ह्यातील गुरांच्या खरेदी-विक्रीच्या बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, त्यांच्या शेती आणि इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेती आणि पशुपालन व्यवसायावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.

आमदारांचे सहकार्य अपेक्षित

शेतकरी आणि व्यापारी यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना या समस्येच्या निराकरणासाठी स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तथाकथित गोरक्षक आणि काही व्यक्तींकडून होणारी मारहाण, लूट आणि जिवितहानीची शक्यता थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. या निवेदनामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर दबाव वाढला असून, येत्या काळात याबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button