सनातनी आतंकवाद म्हटल्याप्रकरणी जळगावमधील सनातनी हिंदूंची आंदोलनाद्वारे मागणी
सनातन द्रोही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करा

जळगाव : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज जळगाव शहरात सनातन संस्था आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने स्टेडियम चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. चव्हाण यांनी ‘भगवा आतंकवाद’ ऐवजी ‘सनातनी आतंकवाद’ किंवा ‘हिंदुत्ववादी आतंकवाद’ असे शब्द वापरण्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतला. ही विधाने हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि सामाजिक शांतता भंग करणारी असल्याचा आरोप करत, आंदोलकांनी चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
या आंदोलनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, रणरागिणी समिती, राष्ट्र भक्त अधिवक्ता समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, स्वामीनारायण संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वीर बाजीप्रभु गणेश मंडळ, श्री महाबली ढोल पथक, हिंदू महासभा, अधिवक्ता संघ, सकल हिंदू समाज आदी अनेक हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय यांचे 200 हून अधिक साधक धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते.
*जर पृथ्वीराज चव्हाण यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू* – सौ सुवर्णा साळुंखे, सनातन संस्था
सनातन संस्थाच्या सौ सुवर्णा साळुंखे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, “मालेगाव, मडगाव आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाने सनातन संस्थेच्या साधकांना आणि हिंदुत्वनिष्ठांना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने ‘हिंदु दहशतवादा’चा सिद्धांत फेटाळून लावत तत्कालीन सरकारांना चपराक लगावली. तरीही चव्हाण वारंवार हेच निराधार आरोप करत आहेत.
*चव्हाणांची भूमिका दुटप्पी !* – श्री. वसंत पाटील, सनातन संस्था
सनातनचे वसंत पाटील यांनी चव्हाण यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली, कारण एकीकडे ते ‘दहशतवादाला धर्म नसतो’ असे म्हणतात आणि दुसरीकडे ‘सनातनी दहशतवाद’ असे शब्द वापरतात. ही विधाने समाजात फूट पाडणारी आहेत.
योग वेदांत सेवा समितीच्या श्री. अनिल चौधरी यांनी चव्हाण
यांच्या वक्तव्यांची सखोल चौकशी करण्याची आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हिंदु जनजागृती समितीच्या श्री. गजानन तांबट म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भगवा आतंकवाद’ ऐवजी ‘सनातनी आतंकवाद’ किंवा ‘हिंदुत्ववादी आतंकवाद’ असे
वक्तव्य करुन हिंदू समाजाला पुन्हा एकदा लक्ष केले आहे. एकीकडे ते सोईस्करपणे दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणतात दुसरीकडे सनातनी दहशतवाद असे म्हणतात.
यातून त्यांचा दुतोंडी व दुटप्पीपणा समोर येतो.
अधिवक्ता निरंजन चौधरी आणि अधिवक्ता राहुल अकोलकर म्हणाले की, मालेगाव स्फोटात जे हिंदू अटक झाले ते सर्व निर्दोष सुटले आहेत तरी सुद्धा हिंदू आतंकवाद कसा असू शकेल हे आरोप खोटे असून चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आकाश फडे म्हणाले की, २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटांनंतर ‘भगवा आतंकवाद’ ही संकल्पना तत्कालीन काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक पसरवली होती, हिंदुना बदनाम करण्याची एकही संधी या काँग्रेसिंनी सोडली नाही.
समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी सांगितले की, त्या वेळी पृथ्वीराज चव्हाण हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. मालेगाव प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या टीममधील तत्कालीन पोलीस निरीक्षक मेहबूब मुजावर यांनी केलेल्या खुलाश्यांचा संदर्भ देत तपास अधिकाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आरोपी बनवण्यासाठी दबाव आणला गेला होता. या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटले असल्याने, तत्कालीन राज्याचे प्रमुख म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची यातील भूमिका संशयास्पद आहे.
यासोबत स्वामीनारायण मंदिराचे श्री. नयन स्वामी, श्री शिवप्रतिष्ठानचे गणेश पाटील सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी आंदोलकाना संबोधित केले.
आंदोलकांनी यावेळी सनातन संस्थेवर वारंवार होत असलेल्या आरोपांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. सनातन संस्था ही गेल्या २५ वर्षांपासून अध्यात्मिक कार्य करत आहे. यापूर्वी २००९ मध्येही चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ठोस पुरावे नसल्याने त्यांना यश आले नाही. तरीही ते पुन्हा-पुन्हा संस्थेवर खोटे आणि द्वेषपूर्ण आरोप करून तिची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या आंदोलनातून अप्पर जिल्हाधिकारी श्री. विजय ढगे यांच्याकडे खालील मागण्या करण्यात आल्या:
1. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानांची सखोल चौकशी करावी.
2. सनातन धर्माचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करावा.
3. भविष्यात अशा प्रकारची विधाने रोखण्यासाठी राजकीय नेत्यांसाठी स्पष्ट आचारसंहिता निश्चित करावी.






