मंगलवार्ता : भल्याभल्यांना जमले नाही ते तरुणांनी करून दाखवले!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील गणेशनगर भागात ५० वर्षापासून राहणारे विश्वनाथ सुतार आणि जनाबाई सुतार यांचे घर मनपा अतिक्रमण विभागाने हटवले. जिल्ह्यात दिग्गज नेते, लोकप्रतिनिधी आणि हजारो समाजसेवक असताना २ दिवस एकानेही ढुंकून पाहिले नाही. स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अँड.पियुष पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत गुन्हे दाखल करण्याची तयारी दाखवली. बघता बघता मित्र परिवार जुळला आणि तीन दिवसात त्या वृद्ध दांपत्याचा पुन्हा गृहप्रवेश झाला.
सुख म्हणजे काय असते ते हेच असते, आम्ही लढलो आम्ही जिंकलो. या दोन ओळीत सामावलेले लहानसे आयुष्य म्हणजे खरे माणुसकीचे जीवन. जळगाव शहरातील गणेश नगर भागात ५० वर्षापासून राहणारे विश्वनाथ सुतार आणि जनाबाई सुतार या वयोवृद्ध दाम्पत्याचा संसार मनपा प्रशासनाने मोडून टाकला. अतिक्रमण केले असल्याचे सांगत उतारवयात त्यांचे छत हरवले. ‘मोडून टाकला संसार तरी मोडला नाही कणा’ कवितेच्या या ओळी दांपत्याने खऱ्या ठरवल्या. जगण्याची जिद्द त्यांना परिस्थितीशी तोंड द्यायला भाग पाडत होती.
मनपाने उगारला कारवाईचा बडगा, नगरसेवकाने दिली हाक
जळगाव शहर मनपाचे पथक कारवाईसाठी गणेश नगर भागात पोहचले. सुतार दांपत्याचे घर एका बाजूला कोपऱ्यात असताना अतिक्रमण विभागाने तत्परता दाखवली. कारवाई सुरू असताना स्थानिक माजी नगरसेवक धीरज सोनवणे यांनी काही माध्यम प्रतिनिधींना कळवले. माध्यम प्रतिनिधींनी सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि वृत्त प्रकाशित झाले.
गुन्हे दाखल करण्याची तयारी, खंबीर भूमिका
दोन दिवस झाले. आजी-बाबा बाहेर रस्त्यावर राहत होते. शेजारी त्यांना खाऊ घालत होते. स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अँड.पियुष पाटील हे त्यांच्या घरी पोहचले. माणुसकीच्या नात्याने त्यांनी लढा देण्याची तयारी केली. मनपाला १ दिवसाचा वेळ देत घर न बांधल्यास स्वतः पुढाकार घेण्याचे जाहीर केले. दुसरा दिवस उगवला आणि कार्यकर्ते कामाला लागले. बघता बघता घर पुन्हा उभारले गेले. खंबीर भूमिका आणि वेळप्रसंगी गुन्हे अंगावर घेण्याची तयारी असल्याने हे शक्य झाले.
मदतीचे हात हजार..
वृद्ध दांपत्यांना मदत करण्यासाठी स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठानचे पीयूष पाटील यांच्यासह जळगावचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार विजय जोशी, देवेश शर्मा, किशोर पाटील, जिल्हा दूध संघ संचालक अरविंद देशमुख, परमवीर जाधव, हर्षल सिंकवाल, योगेश निंबाळकर, अमरनाथ ठाकूर, युसुफभाई मकरा, रवींद्र शिंदे, आयुष मणियार, पियुष मणियार, अमोल पाटील, युवराज जगताप, सुशील शिंदे, निखिल पोपटानी, निखिल पाचपांडे, अमेय राणे, रितेश चौधरी, प्रशांत चौधरी, सौरभ भोई, पवन भोई, अजिंक्य पाटील, तन्मय चौधरी, आकाश पाटील, आदेश देशमुख, सुनय पाटील, मयूर चौधरी, अण्णा मराठे, कुणाल धांडे यांनी आर्थिक सहाय्य करून श्रमदानाची भूमिका बजावली.