राज्य अर्थसंकल्पात शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राज्य अर्थसंकल्पात शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव प्रतिनिधी
राज्य सरकारने शेती, शेतकरी आणि महिलांसाठी भरीव तरतुदी जाहीर करत त्यांना बळ देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करून मराठी अस्मितेला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेचा सन्मान – ‘प्रेरणा गीत’ पुरस्काराची घोषणा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिच्या सन्मानासाठी राज्य शासनाने दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार’ जाहीर केला आहे.
“मराठी अस्मितेचा अभिमान वाढविणारा हा निर्णय सर्व मराठी भाषिकांसाठी गौरवाचा आहे,” असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी 3,875 कोटींची तरतूद
राज्यातील नागरिकांना दर्जेदार पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी 3,875 कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर करण्यात आला आहे.
शेतीसाठी मोठ्या घोषणा – शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प:
नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील 49,516 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना:
राज्यातील 45 लाख कृषी पंपांसाठी मोफत वीजपुरवठा देण्यात येणार असून, 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत मिळणार.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान:
पुढील दोन वर्षांसाठी 2,13,625 शेतकऱ्यांना 255 कोटी रुपयांची आर्थिक मदत.
ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्रे:
शेतकऱ्यांना गावपातळीवर हवामान अंदाज मिळावा यासाठी केंद्रे उभारली जाणार.
▶ सांडपाण्याचे पुनर्वापर प्रकल्प:
उद्योग व शेतीसाठी 8,200 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून सांडपाणी पुनर्वापराची योजना.
शेतीसाठी हरित ऊर्जा – 16,000 मेगावॅट विजेचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा यासाठी सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0:
राज्यातील 2,779 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात येणार.
सौर कृषीपंपांची जलद स्थापना:
जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2,90,129 सौर कृषीपंप बसवले असून, सध्या दररोज 1,000 पंप बसवण्याचे काम सुरू आहे.
“हे सर्व निर्णय ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल घडवणारे ठरणार आहेत,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले.
—
प्राचीन मंदिर संवर्धन आणि महानुभव पंथ स्थळांचा विकास
राज्यातील प्राचीन मंदिरे आणि महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक श्रद्धास्थानांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही पालकमंत्री म्हणाले
“शेती, शेतकरी, महिला आणि मराठी भाषा यांच्या हितासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी भरीव निधी देऊन सरकारने आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.