भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक
भुसावळ (29 मे 2025) : बदलत्या काळाची पाऊले ओळखून डिजिटल मिडीयाशी सुसंगत होत भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या न्युज पोर्टलने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षणाची संधी व उपलब्ध वाटा या विषयावर ‘वाटा शिक्षणाच्या’ या आशयावर काढलेली शैक्षणिक पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेशभाऊ फालक यांनी येथे व्यक्त केला. शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाच्या संगणक हॉलमध्ये गुरुवारी ‘वाटा शिक्षणाच्या’ या पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यांची प्रमुख उपस्थिती
भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकीताई पाटील, जळगावातील लाईव्ह ट्रेंड न्यूजचे संपादक शेखर पाटील (संपादक लाईव्ह ट्रेंड न्यूज), भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई संजय सावकारे, महिला समुपदेशक आरतीताई चौधरी आदींची उपस्थिती होती.
जाहिरातदारांसह मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
द वर्ल्ड स्कूलचे संचालक व सी.ए.रोहित कोलते, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी.फालक, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल, वेलनेस फाउंडेशनचे निलेश गोरे, अॅड.निर्मल दायमा, चेतन जैन, मयूर अंजाळेकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पर्यावरण तज्ज्ञ नाना पाटील यांनी केले तर आभार ब्रेकींगचे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी मानले.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : कृष्णात पिंगळे
‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून काढण्यात आलेली ‘वाटा शिक्षणाच्या’ ही पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितपणे दिशादर्शक ठरेल, यात शंकाच नाही, असा आशावाद भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंग्ळे यांनी येथे व्यक्त केला. शिक्षणाशिवाय तरणापोय नाही, असे सांगत त्यांनी पत्रकारीतेचा ईतिहास यावेळी उलगडून दाखवला. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी गणेश वाघ यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देत त्यांचा पत्रकारीतेचा प्रवास अत्यंत उज्वल असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.
भुसावळात डिजिटल मिडीया सर्वाधिक विकसीत : शेखर पाटील
शहरातील नाहाटा महाविद्यालयात आपले पाच वर्ष शिक्षण झाले व ज्या वर्गात शिक्षण घेतले त्याच वर्गात प्रमुख अतिथी म्हणून बोलण्याची संधी मिळाल्याचा आनंद अलौकीक आहे. बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारत मी प्रिंटमधून डिजिटल मिडीयात पदार्पण केले आहे. जळगाव जिल्ह्यात डिजिटल मिडीया विकसीत झाला असलातरी तो भुसावळातून सर्वाधिक विकसीत झाला असल्याचे मत लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील यांनी व्यक्त केले. अनेक पत्रकार मला फालो करतात व मला फालो करणार्यांमध्ये भुसावळचे पत्रकार गणेश वाघ यांचादेखील समावेश आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देणे आता काळाची गरज आहे. आता स्टोरी टेलिंगचा फार्म्युला आला असून बदलत्या काळानुसार पत्रकारांनीदेखील अपडेट होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मी जळगावकर असलोतरी प्राऊड भुसावळकर असल्याचे शेखर पाटील म्हणाले.
मान्यवरांचा वृक्षाचे रोप देवून सन्मान
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा बुके ऐवजी आवळा व जास्वंदीचे रोपटे देवून आयोजकांकडून यावेळी सन्मान करण्यात आला व पर्यावरण संवर्धनाचा या माध्यमातून संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांना पुरवणी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल : डॉ.केतकी पाटील
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील म्हणाल्या की, ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ची ‘वाटा शिक्षणाची’ ही पुरवणी विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. आगामी काळात आणखी तज्ज्ञ व मार्गदर्शकांना सोबत घेवून शैक्षणिक क्षेत्राविषयी उहापोह करून वाटचाल करावी व त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्यास तयार असल्याचे त्या म्हणाल्या.
पालकांनाही मार्गदर्शन गरजेचे : रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, नाहाटा महाविद्यालयात होत असलेल्या कार्यक्रमाचा वेगळा आनंद आहे. मंत्री संजय सावकारे यांनीदेखील याच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. मुलांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे त्या सोबतच पालकांना मार्गदर्शन गरजेचे आहे. ‘वाटा शिक्षणाच्या’ ही पुरवणी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
एआयसाठी तयार रहा : आरती चौधरी
महिला समुपदेशक आरती चौधरी म्हणाल्या की, एआय संकल्पना सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन पदवी या माध्यमातून मिळवता येवू शकते. वाटा शिक्षणाच्या या पुरवणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निश्चितपणे दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.