
“राष्ट्र प्रथम” रक्तदान अभियानाची भुसावळमधून सुरुवात ; जिल्हाधिकाऱ्यांकडून रक्तदान करत देशसेवेचा संदेश
भुसावळ (प्रतिनिधी) – “रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य” या भावनेतून प्रेरित होत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज भुसावळ येथील विभागीय रेल्वे रुग्णालयात स्वतः रक्तदान करत जनतेला प्रेरणा दिली. याच माध्यमातून “राष्ट्र प्रथम – रक्तदान अभियान” या १५ दिवसांच्या विशेष उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
१५ दिवस, शेकडो शिबिरे, हजारो जीव वाचविण्याचा निर्धार
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून “राष्ट्र प्रथम – रक्तदान अभियान” राबविण्यात येत असून, पुढील १५ दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुके, गावं व शहरी भागात व्यापक स्वरूपात रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये संकलित होणाऱ्या रक्तपिशव्यांपैकी ५०% रक्त भारतीय सैन्याच्या सेवेसाठी तर उर्वरित गरजूंकरिता वापरण्यात येणार आहे.
देशसेवेचा प्रभावी मार्ग : रक्तदान
“सीमेवरील जवान शौर्याने लढत आहेत आणि जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाशी झुंज देत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सर्वसामान्य नागरिकांपुढे हा एक परिणामकारक मार्ग आहे – रक्तदान,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या भावनिक भाषणात सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच जिल्ह्यात व्यापक रक्तदान शिबिरांचे आवाहन केले होते. त्याला भुसावळ येथून दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमाला बळकटी देणारा ठरला आहे.