Special

महा युती-आघाडी ‘फ्लॉप’, सूर्यदेव ‘हिट’

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव लोकसभा मतदार संघ आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी महविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार होते. कुणी ५० हजारांच्या गर्दीचा दावा केला तर कुणी १ लाखांच्या गर्दीचा. दोघांचे दावे सूर्यदेवाने फ्लॉप ठरवले असून त्यांच्याच ‘हिट’ चा तडाखा बसल्याने गर्दीचा आकडा १५ हजारांच्या आतच थांबला.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महा आघाडीच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेनेचे करण पाटील अशी लढत आहे. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील अशी मुख्य लढत होणार आहे. महायुतीकडून स्टार प्रचारक म्हणून संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, फायर ब्रँड मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील हे मैदानात असणार असून महाआघाडीकडून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी मंत्री गुलाबराव पाटील, उन्मेश पाटील, रोहिणी खडसे या मैदानात आहेत.

नेत्यांच्या गर्दीत शक्ती प्रदर्शन ठरले फ्लॉप
सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता महायुतीचे बळ जिल्ह्यात जास्त आहे मात्र जनतेच्या मनात उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रती असलेली जनभावना विसरून चालणार नाही. महाआघाडीचे उमेदवार करण पाटील आणि श्रीराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खा.संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती दिली तरी गर्दीचा आकडा १० हजाराच्या आतच राहिला. विशेष म्हणजे खा.संजय राऊत हे उशिरा आल्याने उन्हात उभे राहत अनेकांचा हिरमोड झाला. महाआघाडीला उत्तर देताना महायुतीने सर्व तालुक्यात गर्दी जमविण्याचे टार्गेट दिले मात्र हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येण्यास दोन तास उशीर झाल्याने बरेच कार्यकर्ते माघारी परतले. महाआघाडी पेक्षा गर्दी अधिक असली तरी आकडा १५ हजारांच्या आतच होता. पोलीस प्रशासनाने तर दोघांचा आकडा १० हजारांच्या आतच असल्याचे सांगितले.

सूर्याने दिला झटका, उन्हाचा बसला फटका
जिल्ह्यात सध्या पारा ४० च्या पुढेच असून ४५ पर्यंत तापमान वाढले आहे. दोन्ही पक्षाकडून शक्ती प्रदर्शन करताना हजारोंचा आणि लाखोंचा आकडा गाठण्याचा दावा केला जात होता मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. गर्दी कमी असण्याला काही कारणे देखील आहेत. सध्या गावोगावी लग्न तिथी, कान जाऊळ समारंभ पार पाडले जात आहे. दुसरीकडे ऊन दिवसेंदिवस वाढत असून उष्माघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महायुतीच्या रॅलीत देखील दोघांना भोवळ आली. प्रकृतीच्या काळजीने बरेच लोक उन्हात जाणे टाळत असल्यानेच शक्ती प्रदर्शनला फारशी गर्दी दिसून आली नाही.

ग्रामीणचा दणका, शहरी फरार – पैसे देऊन आणले कार्यकर्ते
ग्रामीण भागातील नागरिकांना शेतात उन्हात काम करण्याची सवय असल्याने उन्हाची ते फारशी चिंता करीत नाही. दोन्ही रॅलीत ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेच जास्त दिसून आले. शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र कुठे तरी सावलीच्या शोधातच होते. रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय दिसत असली तरी पैसे देऊन बोलवलेली ती गर्दी होती. राजकारणाच्या फडात आजही महिला वर्ग आपल्या घरगुती कामांना प्राधान्य देत असल्याने रॅलीत गर्दी जमविणे अवघड होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button