छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात कानळदा येथे पावणे दोन कोटींचे धनादेश वाटप
कानळदा येथे शिबीर ; २३७१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

महा पोलीस न्यूज । दि.२६ जून २०२५ । महसूल विभागाच्या पुढाकाराने महर्षी कण्व आश्रम, कानळदा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात एकूण २३७१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, पंचायत राज, उद्योग, वन, वीज, निवडणूक व पुरवठा अशा विविध विभागांनी सहभाग घेतला.
या शिबिरात उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र, जिवंत ७/१२, कालबाह्य नोंदी दुरुस्ती, निवडणूक मतदार यादीत नोंदणी, आरोग्य तपासणी, संजय गांधी योजना, घरकुल लाभार्थी, रोहयो, बियाणे व बेंग वाटप, ग्रामपंचायत जन्म-मृत्यू व विवाह दाखले इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण २५ विभागांमार्फत २३७१ नागरिकांना थेट लाभ मिळाला.
विशेषतः महिला बचत गटांना एकूण १ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. कृषी विभागाकडून ५९ प. स. लाभार्थ्यांना, वन विभागाने २४५ नागरिकांना, तर महावितरणकडून २७ लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ७४ लाभार्थी लाभान्वित झाले.
या शिबिरात उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार श्रीमती शितल राजपूत, स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज, निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, महसूल नायब तहसीलदार राहुल वाघ, संगायो नायब तहसीलदार श्रीमती केदार, कानळदा सरपंच बापूसाहेब सपकाळे, मा.प.स.स. राजेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, आणि पंचायत समिती जळगावचे सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मोनाली लंगरे यांनी केले. आयोजनात कानळदा मंडळ अधिकारी श्रीमती छाया कोळी, ग्राम महसूल अधिकारी सदानंद मुंडे, कपिल मेसेकर, प्रशांत बडगुजर, श्रीमती मालती चाफले, महसूल सेवक विजय पाटील, निलेश भोई, श्रीमती मनिषा पाटील, मदतनीस शांताराम लंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून, शासनाच्या ‘दारी सरकार’ संकल्पनेची फलश्रुती जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे या शिबिरातून अधोरेखित झाले.