बाजारात मोबाईल चोरी झाला, एमआयडीसी पोलिसांशी करा संपर्क

महा पोलीस न्यूज । दि.२३ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी मोबाईल चोरीच्या घटना उघडकिस आणून आरोपी अटक करणेबाबत मार्गदर्शन केले होते. भाजी बाजारात नागरिकांना लक्ष करणाऱ्या चोरट्यांच्या मागावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक होते. शनिवार पथकाने दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह एकाला अटक केली. तिघांकडून बाजारात चोरलेले ३३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात दररोज दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घटना घडत असतात. विशेषतः बाजाराच्या गर्दीत चोरटे आपला डाव साधतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांचे पथक गस्तीवर असताना शनिवार दि.२१ रोजी पथकाला एका संशयित आरोपीसह दोन बालके संशयितरित्या फिरताना दिसून आले. तिघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ४ मोबाईल मिळून आले. त्याची विचारपूस केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता ना आल्याने तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
जमिनीत पुरले होते मोबाईल
तिघांना पोलीस ठाण्यात आणून खाक्या दाखवताच त्यांनी मोबाईल चोरीबाबत माहिती दिली. ते सर्व स्वामी नारायण मंदिर नशिराबाद रोड याठिकाणी झोपडी पाल टाकून राहत असल्याचे समजले. त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता ते राहत असलेल्या शेतामध्ये जमिनीत एका पिशवीमध्ये पुरुन ठेवले आहेत असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी शेतातील एका झाडच्या जवळ जमीनीत खडडा करुन पुरुन ठेवलेले ३३ मोबाईल हस्तगत केले आहेत.
रावेरच्या बाजारातून चोरले ८ मोबाईल
पोलिसांनी हस्तगत केलेल्या ३३ मोबाईलपैकी १ मोबाईल रावेर पोस्टे हददीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाल्याने मोबाईलचे शोधात रावेर पोस्टे पोलीस अंमलदार महेश मोगरे हे त्या ठिकाणी आले असता मोबाईलमध्ये रावेर पोस्टे हददीतून गहाळ झालेले एकूण ८ मोबाईल त्यांचे ताब्यात दिले आहेत. तरी आरोपी यास एम.आय.डी.सी.पो.स्टे.गुरन/४४९/२०२५ BNS कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हयात अटक करण्यात आली असून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास पोना हेमंत जाधव हे करत आहेत.
वायरच्या थैलीने मिळाला क्ल्यू
जळगाव जिल्ह्यातील बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी वायरने तयार केलेल्या थैली घेऊन खरेदीच्या माध्यमातून एक गँग सक्रिय होती. एखाद्या ग्राहकाला घेरून त्याच्या आजूबाजूला उभे राहून ते मोबाईल चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एमआयडीसी पोलिसांनी तोच धागा हेरून शनिवारच्या बाजारातून तिघांना पकडले.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनिरी राहुल तायडे, पोउपनिरी चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदिप चौधरी, रतन गिते अशांनी केली आहे. शहरातील तसेच जिल्हयातील ज्या नागरीकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरी झाले असतील त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.