सा.बां. विभागाला कर्तव्याचा विसर;वाहनधारकाच्या जीवाशी होतोय खेळ

सा.बां. विभागाला कर्तव्याचा विसर;वाहनधारकाच्या जीवाशी होतोय खेळ
सुभाष धाडे, मुक्ताईनगर
मागील आठवड्यात परीसरात झालेल्या मान्सुनपुर्व वादळी पावसामुळे तालुक्यातील रस्त्यावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळुन पडलेले असतांना, ती वृक्ष रस्त्याच्या बाजुला सारण्याची तसदी देखिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन घेतली जात नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतांना दिसून येत आहे.
तालुक्यातील साखर कारखाना ते पुरनाड फाटा दरम्यान असलेल्या मलकापुर – बऱ्हाणपूर या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी काही छोटे-मोठे वृक्ष, काही ठिकाणी फांद्या कोसळल्या असुन अपघाताचा धोका वाढलेला आहे.आधीच ठिकठिकाणी मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांनी रस्ता व्यापलेला आहे. यातच भर म्हणजे काही ठिकाणी अर्धा रस्त्या पर्यत उन्मळलेल्या वृक्षांच्या फांद्या आडव्या येत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रात्रीच्या वेळी मोटार-स्वारांचे किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही घडत असतांना, संबंधित विभाग सुस्तावलेला असल्याचे दिसुन येते. रस्त्याच्या कडेला पडलेल्या फांद्या उचलुन बाजुला सारणे व जीवघेणे खड्डे बुजविणे एवढे कर्तव्य देखील सा.बां विभागाकडुन पार पाडले जात नसल्याने, ‘सां.बां विभागाला पडला कर्तव्याचा विसर!’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दोन राज्यांना जोडणाऱ्या या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर रात्रंदिवस अवजड वाहतुक होत असते.रात्रीच्या वेळेस समोरील वाहनाच्या प्रकाशामध्ये अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे व रस्त्याच्या कडेला अगदी रस्त्यावर आडव्या पडलेल्या फांद्या स्पष्टपणे नजरेस पडत नसल्याने जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे.याशिवाय अनेक किरकोळ तसेच काहीसे गंभीर स्वरुपाचे अपघात घडत असतांना सा.बां च्या जबाबदार अधिकारी यांना याबाबत काहीही सोयर सुतक नसल्याचे या सर्व गोष्टीवरुन जाणवते हे मात्र तितकचं खरं .
मुक्ताईनगर येथील बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभुमी लगत पासुन जुने घोडसगाव जाणारा नवीन बनविण्यात आलेला रस्ता अल्पावधीतच म्हणजे तीन-चार वर्षातच अनेक ठिकाणी रस्त्याचा बिएम दबला जाऊन तसेच उकरला जावुन पुर्णपणे खड्ड्यांनी व्यापलेला असल्याचे चित्र आहे.काही ठिकाणी साईडपट्ट्या खचल्या तर काही ठिकाणी काटेरी वृक्षांनी व्यापला.
तालुक्यातील मौजे दुई-सुकळीजवळ मोठमोठे खड्डे पडलेले आहे.याच परीसरातुन अपघाताचे डेंजर झोन म्हणुन ओळखले जाणारे ‘राशा बरड’ जवळ ऐन चढतीवर खड्डे असल्याने अनेकांना जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे.या वर्षभरात अनेक वाहने या रस्त्यावर नादुरुस्त देखील झाले. परीसरातुन तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या अनेकांनी या रस्त्याला वैतागुन डोलारखेडा फाटा-जुने घोसगाव-कुंड मार्गे जाणे-येणे सुरु केले.
तालुक्यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे,विधान परीषद आमदार एकनाथराव खडसे तसेच आमदार चंद्रकांत पाटील असे राजकिय वजनदार नेते लाभलेले असतांना, संबंधित विभागाचा हा हलगर्जी पणा चालतो तरी कसा ? असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे.