एमआयडीसीच्या हद्दीत गोळीबार, संशयीत अटक मात्र..

महा पोलीस न्यूज | २ मार्च २०२४ | जळगाव शहरातील मेहरूण परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी संशयितांना देखील अटक केली. एमआयडीसी पोलिसांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असली तरी गुन्हा दाखल होण्यास विलंब का झाला, पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ का करीत होते असा प्रश्न मात्र कायम आहे. काही दिवसांपूर्वी देखील असेच एका प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती मात्र तक्रारदाराने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुक्रवार दि.१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सोहम गोपाळ ठाकरे वय-२८वर्षे, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण हा त्याच्या मित्रासह श्रीराम कन्या शाळा मेहरुण जवळ उभा असताना दिक्षांत उर्फ दादु देवीदास सपकाळे वय-१९ वर्षे, रा.लक्ष्मीनगर, मेहरुण व त्याचा मित्र गोपाळ सीताराम चौधरी वय-२० वर्षे, रा.रेणुका नगर, मेहरुण असे मोटारसायकलने आले होते तसेच त्यांच्या सोबत दुस-या मोटारसायकलवर दोन अनोळखी तरुण देखील होते. जुन्या वादाच्या कारणावरुन दिक्षांत सपकाळे व त्यांच्या सोबतच्या तरुणांनी सोहम यास शिवीगाळ केली व दिक्षांत याने सोहम यास तुझा मुर्दा पाडतो असे बोलुन त्याठिकाणी असलेला त्याचा मित्र गोपाळ याने त्यांच्या कमरेला लावलेला गावठी कटटा दिक्षांत यांच्याकडे देउन दिक्षांत याने सोहमवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार केला होता.
जीव वाचविण्यासाठी सोहमने त्या ठिकाणावरुन पळ काढला तर दिक्षांत सपकाळे व त्याच्यासोबतचे मित्र मोटारसायकलने त्या ठिकाणावरुन निघुन गेले होते. सोहम त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिक्षांत सपकाळे व गोपाळ चौधरी तसेच दोन अनोळखी इसमांविरुध्द खुनाचा प्रयत्न करणे या सदराखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता आणि संशयीत हाती लागत नसल्याने अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी घटनास्थळी व पोलीस ठाण्याला भेट दिली होती.
गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपी पकडणे बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या होत्या, त्यानुसार आरोपीतांचा शोध सुरु होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने दिक्षांत उर्फ दादु देवीदास सपकाळे व गोपाळ चौधरी यांना ताब्यात घेतले होते व त्याच्याकडुन त्यांच्यासोबत असलेले दोन साथीदार यांची नावे निष्पन्न करुन यांना देखील ताब्यात घेतले होते. दिक्षांत त्याच्यावर यापुर्वी ८ गुन्हे दाखल आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, हवालदार किरण पाटील, सचिन मुंढे, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे अशांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील सहाय्यक पोलीस निरिक्षक दयानंद सरवदे व निलेश पाटील करीत आहे.
दरम्यान, संशयीत आरोपी यांना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसात ३ संशयीत आणि ३ गावठी कट्टे पकडणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या काय सुरू आहे असा प्रश्न या गुन्ह्याचा निमित्ताने समोर आला आहे. डिबी पथकाचे कर्मचारी दमदार काम करीत असताना गुन्हे दाखल करण्यास होणारा विलंब संशय व्यक्त करणारा ठरतो. पोलीस ठाण्यापासून फार लांब नसलेल्या अंतरावर गोळीबार होणे, फिर्यादी पोलीस ठाण्यात येणे असे असताना देखील गुन्हा दाखल करण्यास उशीर का झाला? हा प्रश्न अनुत्तरित आहे. काही दिवसांपूर्वी देखील एका वादाच्या प्रकरणात आणि हॉटेल चॉपरच्या घटनेत देखील असाच प्रकार घडला होता.
गोळीबाराची घटना आणि संशयीत माहिती असताना देखील रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी घटनास्थळी व पोलीस ठाण्याला भेट दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या डझनभर अवैधधंद्याची माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात सर्व आलबेल कारभार सुरू आहे असेच वाटते.