EducationSocial

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । परीक्षा कोणतीही असो यश-अपयश सुरूच असते मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा यशाचा पाठलाग करावा. गुणगौरव सोहळ्यात सन्मान स्वीकारल्यानंतर आपली जबाबदारी आणखी वाढते. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते तरी आज अनेक लोक यशस्वी झालेले आहेत. आज प्रत्येकाने मोबाईल आणि एआय तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

वैश्यवाणी युवा फाऊंडेशनच्या वतीने आज बळीराम पेठ येथील ब्राह्मण समाज कार्यालयात वैश्यवाणी समाजातील दहावी, बारावी, आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, उपाध्यक्ष भूषण वाणी आणि सचिव राकेश वाणी यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला समाजातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

समाजाने एकोप्याने राहून प्रगती करावी : आ.राजुमामा भोळे 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश उर्फ राजुमामा भोळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना म्हणाले, “शिक्षण हे विकासाचे प्रवेशद्वार आहे आणि वैश्यवाणी युवा फाउंडेशनने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत आणि अशा उपक्रमांमुळे त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळते. समाज आपल्याला जोडून ठेवतो. समाजाने एकोप्याने राहून प्रगती करावी. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

समाज भूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव


कार्यक्रमात जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अनिल अमृत वाणी, पुणे येथील बाल साहित्यिक चिन्मयी शेटे, माजी सैनिक आणि तलाठी संदीप सूर्यवंशी तसेच युवा उद्योजक आणि ऑक्सिमाइन वॉटरचे राकेश निंबा वाणी यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. चिन्मयी शेटे म्हणाल्या, साहित्य आणि शिक्षण यांच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देण्याचा माझा प्रयत्न आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. राकेश शेटे यांनी ब्रँड तयार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम ठेवावा लागतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील असेच ध्येय ठेवावे असे त्यांनी सांगितले. संदीप सूर्यवंशी म्हणाले की, मी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवीन ध्येय गाठण्याचे स्वप्न पाहिले. सातत्य ठेवल्याने एकाच वेळी ५ परीक्षा उत्तीर्ण झालो. आपण आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्य ठेवले तरच यश मिळेल असे त्यांनी सांगितले.

९० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


सोहळ्यात ९० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि फोल्डर फाईल देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षणातील आव्हाने आणि यशाबद्दल विचार व्यक्त केले. दहावीची विद्यार्थिनी म्हणाली, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. यापुढेही मी मेहनतीने समाजाचे नाव उंचावेन.” बारावीच्या विद्यार्थ्याने आजचा हा दिवस मी कधीच विसरणार नाही. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यामुळे मला माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी बळ मिळाले आहे.

फाऊंडेशनचे भविष्यातील उपक्रम

प्रास्ताविकात चेतन वाणी यांनी सांगितले की, हा गुणगौरव सोहळा दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला असून, भविष्यात समाजासाठी विविध उपक्रम राबविले जातील. सूत्रसंचालन करताना राकेश वाणी यांनी समाज एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “समाज एकजूट करणे हे मोठे आव्हान आहे. येणाऱ्या काळात वधू-वर परिचय मेळावा, समाजाचे अधिवेशन आणि ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपर्क सूची तयार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.” यासोबतच त्यांनी सर्वांना शिक्षण आणि सामाजिक कार्यात पुढे येण्याचे आवाहन केले.

उपक्रमाचे यशस्वी आयोजन


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैश्यवाणी युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, उपाध्यक्ष भूषण वाणी, सचिव राकेश वाणी यांच्यासह मुकेश जाधव, पंकज शेटे, हर्षल वाणी, प्रसाद वाणी, परी वाणी, वसीम खान, जकी अहमद आणि सुनील भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी फराळची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे उपस्थितांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. निकिता शेटे यांनी आभार प्रदर्शन केले.

समाज एकजुटीसाठी प्रेरणादायी पाऊल

गुणगौरव सोहळा वैश्यवाणी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच समाज एकजुटीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरला. उपस्थितांनी फाऊंडेशनच्या कार्याला पाठिंबा दर्शवत भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button