बारावी परीक्षेचा निकाल जाहीर : जळगाव जिल्ह्याची ९४.५४ टक्के उत्तीर्णता

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर : जळगाव जिल्ह्याची ९४.५४ टक्के उत्तीर्णता
पालकमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन
जळगाव – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेचा निकाल सोमवार, ५ मे २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात जळगाव जिल्ह्याचा निकाल 94.54 टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे. पण ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी नाउमेद होऊ नये, प्रयत्न करत रहा नक्की यश मिळेल असा मोलाचा सल्ला दिला आहे.
या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील जळगाव जिल्ह्याने ९४.५४ टक्के उत्तीर्णतेसह उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात एकूण ४४,७३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली असून त्यापैकी ४२,२९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नाशिक विभागातील एकूण निकाल ९१.३१ टक्के लागला असून नाशिक जिल्ह्याने ९५.६१ टक्के, धुळेने ७४.८८ टक्के व नंदुरबारने ८६.६२ टक्के उत्तीर्णता नोंदवली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यश मिळाले नसलेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता आत्मपरीक्षण करून पुढील प्रयत्नात यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले. “यशाचा मूलमंत्र म्हणजे सातत्य आणि संयम, पुढच्या वेळेस नक्की यश मिळेल यासाठी शुभेच्छा!” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी ६ मे ते २० मे २०२५ या कालावधीत http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.