‘रील’च्या नादात मृत्यूशी खेळ ; दोन तरुणांचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत !

‘रील’च्या नादात मृत्यूशी खेळ ; दोन तरुणांचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत !
पाळधी येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी): मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात दोन शाळकरी मित्रांनी आपल्या जीवाशीच खेळ खेळल्याची हृदयद्रावक घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी-चांदसर रेल्वे गेटजवळ घडली. रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास अहमदाबाद–हावडा एक्सप्रेसने दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पाळधी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (दोघेही वय १८, रा. महात्मा फुले नगर, पाळधी) अशी आहेत. हे दोघेही मनमिळाऊ, हसतमुख आणि परिसरात लोकप्रिय स्वभावासाठी परिचित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीचा दिवस असल्याने हे दोघे मित्र रेल्वेगेट परिसरात फिरायला गेले होते. मोबाईलवरील सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी आकर्षक आणि धोकादायक ‘रील’ बनवण्याच्या उद्देशाने ते रेल्वे ट्रॅकवर उभे राहून व्हिडिओ शूट करत होते. त्याचवेळी धरणगावकडून जळगावच्या दिशेने वेगाने येणाऱ्या अहमदाबाद–हावडा एक्सप्रेसने त्यांना जबर धडक दिली. रेल्वेचा वेग इतका प्रचंड होता की दोघांनाही सावरता आले नाही आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वाढत चाललेल्या धोकादायक रील बनवण्याच्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजातील सुजाण नागरिकांनी आणि पालकांनी तरुणांना जबाबदारपणे सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.






