विवाहित तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…

विवाहित तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…
असोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील असोदा येथे एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. सागर मधुकर चौधरी असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा आपली पत्नी आणि एका मुलासह असोदा येथे राहत होता. त्याचे आई-वडील नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. सागर किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या वेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
सागरच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जळगाव तालुका पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे असोदा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






