Social

कष्ट आणि जिद्दीचं यश: संध्या मोरे यांची ‘स्वामी समर्थ पाणीपुरी’

अमळनेर (पंकज शेटे) : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील तिरंगा चौकातून जाताना, ‘स्वामी समर्थ चाट अँड पाणीपुरी’ नावाची एक गाडी तुमचं लक्ष वेधून घेईल. या गाडीच्या मागे उभ्या असलेल्या सौ. संध्या योगेश मोरे यांचा चेहरा साधेपणा आणि कणखर आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. अनेक वर्षे शेतीत कष्ट केलेल्या संध्याताई, आता पाणीपुरीच्या व्यवसायातून कुटुंबाला हातभार लावत आहेत.

या व्यवसायामागे एक प्रेरणादायी कथा दडलेली आहे. पतीचा व्यवसाय म्हणावा तसा चालत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. या कठीण काळात त्यांना त्यांच्या माहेरच्या कुटुंबाने, विशेषतः त्यांच्या भावाने भक्कम साथ दिली. पाणीपुरीची गाडी आणि इतर आवश्यक साहित्य भावाकडून मिळालं आणि त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली.

आपल्या संघर्षाबद्दल बोलताना संध्याताई म्हणाल्या, “सर, एखाद्याच्या नशिबी कष्ट असतातच… पण जो कष्ट करतो त्याला देवही साथ देतो. आई-वडिलांचे आणि सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद हेच माझं खरं भांडवल आहे.” त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची कोणतीही खूण नव्हती, उलट त्यांच्या डोळ्यात जिद्दीचा एक वेगळाच उजेड दिसत होता.

या गाडीवर मिळणारी पाणीपुरी ही केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर त्यात त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा स्वाद जाणवतो. म्हणूनच ही चव चाखण्यासाठी ग्राहक पुन्हा-पुन्हा येत आहेत. संध्याताईंचा हा प्रवास केवळ एका व्यवसायाची सुरुवात नसून, तो कष्ट, स्वाभिमान आणि यशाची गाथा सांगणारा आहे. त्यांच्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवून, हे यश नक्कीच आणखी उंच शिखरे गाठेल यात शंका नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button