
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी पोलीस मुख्यालयातील २३२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बदली प्रक्रिया राबवण्यात आली. बदली करताना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ठरलेल्या निकषानुसार बदल्या केल्या मात्र सर्वांना विचारणा करताना हसत-खेळत, गप्पा करीत बदल्या करण्यात आल्या.
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी यंदा काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. एका विभागात १० वर्ष, एक पोलीस ठाण्यात ५ वर्ष आणि स्वग्राम तालुका नेमणुकीला असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत आहे. तसेच स्थगितीला देखील नकार दिला जात आहे.
मजेशीर किस्से आणि खुलले हसू
बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असताना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे कर्मचाऱ्यांना विचारणा करत आहेत. विचारणा केल्यानंतर शक्यतो पसंतीचे ठिकाण दिले जात आहे. एका अंमलदाराने पसंतीच्या ठिकाणी बदली मागितली असता अधीक्षक ते देण्यास तयार नव्हते. अंमलदाराने अहिराणी भाषेत ‘साहेब बदली करी द्या, तुम्हने नाव राही जायी’ अधिक्षकांना अर्थकळला नाही मात्र इतर सर्व अधिकारी व कर्मचारी चांगलेच हसू आले. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी डॉ.रेड्डी यांना अर्थ सांगितल्यावर ते देखील हसू लागले. अखेर खुश होऊन साहेबांनी त्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली करून दिली.
अनेक कर्मचाऱ्यांची आली मज्जा
बदलीमध्ये अनेक महिला कर्मचाऱ्यांची चांगलीच मज्जा आली. एक महिला कर्मचारीचे पती देखील पोलीस अधिकारी असून ते पदोन्नतीने जळगाव जिल्ह्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांनी उत्सुकतेने विचारणा केली की जळगावच कसे येणार? महिला कर्मचारी म्हणाली की मला माहिती आहे. अधिक्षकांनी तुम्ही आता चाळीसगाव जाणार हे तुम्हाला माहिती नाही असे सांगत त्यांची फिरकी घेतली. एक महिला कर्मचारीने स्थगितीसाठी अधिक्षकांना किमान १०-१५ वेळा प्लीज प्लीज म्हणत विनवणी केली. अखेर साहेबांनी हो सांगत विनंती मान्य केली. एक पोलीस कर्मचाऱ्याने एलसीबी शाखेची मागणी केली. अधिक्षकांनी नकार दिला असता मी देखील बदलीसाठी फोन आणतो असे तो कर्मचारी म्हणाला. अखेर त्याची वाहतुक शाखेत बदली करण्यात आली.