विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; इन्स्टाग्रामवर केली घोषणा

मुंबई महापोलीस न्यूज l१२ मे २०२५
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोमवारी (दि. १२ मे) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. या निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.बीसीसीआयला आधीच कळवले होते
सूत्रांनुसार, कोहलीने काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) निवृत्तीबाबत कळवले होते. मात्र, मंडळाने त्याला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. अखेरीस कोहलीने आपला निर्णय कायम ठेवत कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचे ठरवले.
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील कामगिरी
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत कोहलीची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमीच राहिली. त्याने ९ डावांत १९० धावा केल्या, ज्यात एक नाबाद शतकाचा समावेश होता. त्याची सरासरी २३.७५ इतकी होती. विशेष म्हणजे, तो ७ वेळा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूंवर बाद झाला. गेल्या ५ वर्षांत त्याने ३७ कसोटी सामन्यांत फक्त ३ शतके केली असून, त्याची सरासरी ३५ पेक्षा कमी राहिली आहे
.टी-२० आणि आयपीएलमधील दमदार कामगिरी
कोहलीने याआधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आयपीएल २०२५मध्ये त्याने दमदार पुनरागमन करत ११ सामन्यांत ५०५ धावा काढल्या. यामुळे त्याच्या फॉर्मबाबत कोणतीही शंका नव्हती, परंतु कसोटी क्रिकेटमधील सातत्याच्या अभावामुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला.
विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे चाहते आणि क्रिकेट समीक्षकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक योगदान देणाऱ्या कोहलीच्या या निर्णयामुळे कसोटी संघातील त्याची जागा भरणे हे बीसीसीआयसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. कोहली आता आयपीएल आणि इतर व्यावसायिक लीगवर लक्ष केंद्रित करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.