
जळगाव l महापोलीस न्यूज l १४ मे २०२५ l
लग्नाच्या काही दिवस आधीच आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली आहे. तालुक्यातील वाकडी येथील २१ वर्षीय तरुण शेतकरी अमोल वाल्मीक पाटीलने मंगळवारी सकाळी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमोल पाटील हे आई-वडील आणि दोन भावांसह वाकडी येथे राहत होते. त्यांचे लग्न २१ मे रोजी ठरले होते आणि घरात हळदीपासून लग्नापर्यंतच्या तयारीत व्यस्तता होती. मात्र, सोमवारी रात्री जेवणानंतर अमोल शेतात गेला आणि परत आला नाही. मंगळवारी सकाळी ग्रामस्थांना तो झाडाला गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.